नवी दिल्ली – देशात करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. आठव्या दिवशी आरटी पीसीआरची चाचणी करून त्यांना सोडण्यात येणार आहे. प्रवाशांना ‘एअर सुविधा’वर आरटी पीसीआर निकाल अपलोड करावा लागणार आहे. दरम्यान देशात ओमायक्रॉनच्या प्रकरणांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे. तर दैनंदिन करोना रुग्णांची संख्या 1 लाख 17 हजारांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी दैनंदिन मृत्यूची संख्याही 300 च्या पुढे गेली. अशा परिस्थितीत देशातील करोना विषाणूला रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
करोनाच्या ताज्या प्रकरणांनंतर, जोखीम श्रेणीतील देशांची संख्या 19 वर पोहोचली आहे. या श्रेणीमध्ये आणखी 9 नवीन देशांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वे 11 जानेवारीपासून धोका असलेल्या देशांसाठी लागू होतील.
1 डिसेंबरपासून लागू झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 11 देशांना करोनासंदर्भात धोकादायक देशांच्या यातीत समाविष्ट करण्यात आले होते, त्यात यूके, युरोपमधील देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यांचा समावेश आहे. आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आल्यावर आणखी 9 देशांचा समावेश करण्यात आला आहे परंतु पूर्वी समाविष्ट केलेला सिंगापूर हा धोका असलेल्या देशांच्या श्रेणीतून काढून टाकण्यात आला आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या देशांमध्ये घाना, टांझानिया, काँगो, इथिओपिया, कझाकिस्तान, केनिया, नायजेरिया, ट्युनिशिया आणि झांबिया यांचा समावेश आहे.