भारतीय संघाचा शिलेदार, विक्रमांचा बादशहा रोहित शर्मा याने आता विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आपला फॉर्म कायम राखताना केवळ टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांतीलच नव्हे तर कसोटीतील स्पेशल फलंदाज सलामीवीर असल्याचेही सिद्ध केले आहे. रोहितने दोन्ही डावांत शतकी खेळी केल्याने शिखर धवन, के. एल. राहुल, मुरली विजय आणि पृथ्वी शॉ यांचे संघात सलामीवीर म्हणून पुनरागमन करणे धोक्यात आले आहे.
विश्वकरंडक स्पर्धेतील विक्रमी शतकी खेळी केल्यानंतर भरात असताना देखील त्याचा समावेश वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत का केला गेला नाही असा प्रश्न पडला होता, मात्र निवड समितीने आपली चूक सुधारताना त्याला सध्या सुरू असेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान दिले तेही एक सलामीवीर म्हणून. रोहितने मिळालेल्या या संधीचे सोने केले. त्याने या मालिकेतील पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत विक्रमी शतकी खेळी केल्या. तो खरेतर पांढऱ्या चेंडूवरील क्रिकेटचा हुकमी फलंदाज असाच ओळखला जायचा, कारण त्याने 27 कसोटीत केवळ दीड हजार धावाच केल्या होत्या, मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत एक वेगळाच आणि अत्यंत जबाबदारीने संघाची गरज ओळखून फलंदाजी करणारा संयमी पण हिशोबात धोका पत्करणारा फलंदाज वाटला. त्याचे लग्न झाले, तो पिता देखील बनला आणि त्यानंतरच रोहितमध्ये कायापालट झाला. त्याच्या नावावर एकदिवसीय तसेच टी-20 मधील अनेक विक्रम जमा आहेत, आता त्याने कसोटीतही विक्रमांचे पुस्तक लिहायला घेतले आहे.
सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये भारताच्या विराट कोहलीप्रमाणेच संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने देखील सातत्याचे प्रदर्शन दाखवायला सुरुवात केली आहे. रोहितने या पुर्वीही दमदार खेळी केलेल्या आहेत मात्र त्यावेळी त्याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव होता, मात्र आता रोहित वेगळाच भासत आहे. विराट कोहलीच्या डोक्यावरचे ओझे त्याने आपल्याही खांद्यावर घेतले आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून रोहितने आपल्या फलंदाजीने (माफ करा) दांडपट्ट्याने गोलंदाजांची पिसे काढायला सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शतक, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक आणि पाकिस्तानविरुद्ध पुन्हा शतक असे अफलातून सातत्य रोहितने दाखविले आहे.
रोहितने जेव्हा भारतीय संघात पदार्पण केले तेव्हा जाणकारांनी त्याचे खूपच कौतुक केले होते, मात्र त्याच्या खेळीत जबाबदारीचा आणि सातत्याचा आभाव वारंवार दिसत होता. या स्पर्धत मात्र रोहित निराळाच भासत आहे. त्याचे लग्न झाल्यापासून त्याच्या खेळीत खरा आत्मविश्वास आल्याचे बोलले जात आहे. त्याला अनेक टोपणनावे ठेवण्यात आली आहेत. हिटमॅन, शाणा आणि मिस्टर टॅलेन्टेड अशा नावांनी तो प्रसिद्ध आहे. पण त्याच्या जितक्या खेळी पाहिल्या त्यात त्याने शतकी खेळी किंवा अर्धशतकी खेळी केल्या. त्यानंतर पुढील सामन्यांमध्ये त्याला हेच सातत्य टिकविण्यात वारंवार अपयश येत होते. एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन वेळा द्विशतकी खेळी केलेल्या रोहितकडे नजाकत आहे, शैली आहे, कोणत्याही गोलंदाजीची पिसे काढण्याची क्षमता आहे, संघाला बिकट स्थितीतून बाहेर काढण्याची कला आहे, मात्र हे सगळं प्रत्यक्ष मैदानावर फार वेळा दिसले नाही. तो कायमच बेजबाबदारपणे खेळतो असे वाटत होते. विराट कोहलीने जे सातत्य राखले आहे, त्याच सातत्याची अपेक्षा जाणकार व चाहते रोहितकडून करत राहिले व त्यांचे समाधान रोहित कधीच पूर्ण करू शकला नाही. आयर्लंडविरुद्ध 2007 मध्ये त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केले. आजपर्यंत त्याने 209 सामन्यांत खेळताना आठ हजारांपेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. त्यात 24 शतके व 42 अर्धशतके फटकावली आहेत.
रोहितचा जन्म नागपूरमधील बनसोड गावात झाला. त्याचे वडील गुरुनाथ हे एका ट्रांसपोर्ट कंपनीमध्ये केअरटेकर म्हणून काम करायचे, त्याची आई विशाखापट्टणम येथील आहेत. रोहितला विशाल नावाचा मोठा भाऊ आहे. अत्यंत बिकट स्थितीत त्यांची गुजराण होत होती. रोहित व त्याचे कुटुंब डोंबिवलीत एका छोट्या घरात राहात होते. त्याच्यातील क्रिकेटच्या आवडीला त्याच्या आजोबांनी आणि काकांनी पाठिंबा दिला व तेथूनच एका सामान्य मुलाचा महान क्रिकेटपटू बनण्याचा प्रवास सुरू झाला. त्याच्या काकांमुळे त्याला क्रिकेटचा खर्च करता आला. त्याने 1999 मध्ये दिनेश लाड यांच्याकडे सराव सुरू केला, त्यांनी त्याला शाळा बदलण्याचा सल्ला दिला व त्याने शाळा बदलली. तिथेच लाड प्रशिक्षण देत होते. त्याला शिष्यवृत्ती देखील मिळाली व त्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल पडले. एक ऑफस्पिनर म्हणून त्याने नाव कमवायचे ठरविले मात्र, लाड यांना त्याच्यात महान फलंदाज बनण्याचे गुण दिसले व त्यांनी त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला व रोहितने तो मानला.
आज भारतीय संघाला विराट कोहलीच्या पाठोपाठ एक अफलातून फलंदाज गवसला. रोहितने शालेय, क्लब स्तरावर सातत्याने फलंदाजी करत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. रणजी करंडक स्पर्धेत देखील त्याच्या बॅटमधून भरघोस धावा निघत होत्या. त्याचवेळी त्याची भारतीय संघात निवड झाली. त्याला पहिल्याच सामन्यात संघात स्थान मिळू शकले नाही मात्र त्याने त्यानंतर झालेल्या टी-20 स्पर्धेच्या विश्वकरंडक स्पर्धेत अफलातून खेळ केला. त्यानंतर मात्र तत्कालिन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्यावर विश्वास ठेवला व त्यामुळेच रोहितला आत्मविश्वास मिळाला.
मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तर त्याने थक्क करणारी फलंदाजी केली. या मालिकेत त्याने 147 धावांची खेळी केली, त्यानंतर त्याने पुढील सामन्यात एकदिवसीय कारकिर्दीतील वैयक्तिक पहिले द्विशतक साकार केले. श्रीलंकेविरुद्ध तर त्याने ईडन गार्डन मैदानावर हाहाकार माजविला. त्याने 264 धावांची अविश्वसनिय खेळी करत आपली बॅट नसून दांडपट्टा असल्याचे दाखवून दिले. या खेळीत त्याने सोळा षटकार मारत विक्रम साकार केला. आज रोहितच्या नावावर एकदिवसीय सामन्यांची तीन द्विशतके आहेत. 2011 ची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा भारतीय संघाने जिंकताना 1983 नंतर 28 वर्षांनी पुन्हा एकदा विजेतेपदावर मोहोर उमटविली. या स्पर्धेत जो रोल युवराजसिंगने दाखविला त्याचीच पुनरावृत्ती यंदाच्या स्पर्धेत रोहित दाखवित आहे. भारतीय संघाला आधी सचिन तेंडुलकरवर भरोसा ठेवावा लागत होता, त्यानंतर ही धुरा विराट कोहलीने सांभाळली मात्र, आता त्याचा भार हलका करण्यासाठी रोहितने देखील कंबर कसली आहे. अजून खूप सामने त्याला खेळायचे असून अनेक बलाढ्य संघांशी दोन हात करायचे आहेत. आता कोहलीवर अवलंबून चालणार नाही, रोहितला देखील प्रचंड सातत्य दाखवावे लागणार आहे. भारतीय संघाची फलंदाजी रोहित व कोहली यांच्यावरच जास्त अवलंबून आहे. जर हे दोघे सातत्याने धावा करत राहिले तर कोणत्याही संघाला पाणी पाजण्याची त्यांची क्षमता आहे. स्पर्धा जरी कोणा एकट्या खेळाडूच्या खेळावर जिंकता येत नसली तरी मोक्याच्या क्षणी सरस खेळ केला तर त्यात यश निश्चितच मिळविता येते.
संघातील अन्य फलंदाज देखील महत्त्वाचे असले तरी सामन्यातील कठीण प्रसंगातही संघाला यशाच्या शिखरावर कसे घेऊन जायचे याचे धडे रोहितलाच द्यावे लागणार आहेत. प्रत्येक सामन्यात विराटकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा रोहितला आपले सातत्य सिद्ध करत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलावा लागणार आहे. संघातील इतर फलंदाज महत्त्वाचे असले व कोणा एक दोघांच्या खेळावर स्पर्धा जिंकता येत नाही हे जरी खरे असले तरी प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यात रोहित आणि कोहली समर्थ आहेत. ही स्पर्धा खरेतर रोहितसाठी नवे रूप दाखविणारी ठरत आहे. संघाच्या यशात जास्तीतजास्त वाटा उचलत रोहितने कोहलीला अशीच साथ दिली पाहिजे.
– अमित डोंगरे