आपल्या वर्तनाचा संबंध ग्लॅमरशी तर विचारांचा संबंध थेट ग्रामरशी असल्याचं प्रथम समजून घेणं अधिक जरुरीचं असतं. आपल्या विचारांतून आपल्या संकृतीचं आणि प्रकृतीचं दर्शन घडून येत असतं. पण विचारांपुर्वीच केलेल्या वर्तनातून काहीवेळा काहीजणांमध्ये विकृतीचं दर्शन घडतं, ते कोणालाही मान्य नसतं. एकूणच अशांतून नकारात्मक वातावरण निर्माण होत राहतं, ते अधिक तापदायक, घातक ठरू शकतं, ह्याची जाणीव होणं आवश्यक असतं. प्रगल्भ विचार आणि दिलदार मन लाभलेली कोणतीही व्यक्ती आकृती उरत नसते, तर ती स्वतःच एक कलाकृती बनून राहते. अशी व्यक्ती आपल्या संस्कृतीचं स्मरण ठेवून, स्वतःच्या प्रकृतीला अनुसरून, समाजातील विकृतीकरण थांबवण्यात सक्रिय असते. यातूनच कलाकृती साकारली जात असते, पाहायला मिळते. अशा व्यक्ती आपलं जगण्यापलीकडचं जीवन सामाजिक बांधिलकीचं भान राखून नवनवीन कलाकृती साकारत असतात.
हल्ली अनेकजणांना सोशल मीडियानं ग्रासलं आहे. फेसबुक, युट्यूब, व्हॉटस् ऍप इत्यादीच्या माध्यमातून अनकेदा बघायला मिळणाऱ्या काही पोस्ट, छायाचित्रं, व्हिडिओ, मजकूर हे सर्व कितपत सत्याची बाजू घेतात, हे समजणे अवघड असतं. त्यांत समाविष्ट असलेली नकारात्मकता थेट आपल्या अंतर्मनावर विपरीत परिणाम करायला लागते. कदाचित एखाद्या व्यक्तीचं यश देखील आपल्या मनात नकारात्मक विचार निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतं. अलीकडच्या काळात अल्पवयीन मुलं-मुली नैराश्याचे शिकार होताना दिसत आहेत. नकारात्मक विचारांचं पर्यवसान रागात, उद्वेगात आणि कालांतरानं गुन्हेगारीत होण्याचं प्रमाण अलीकडच्या काळात खूपच वाढल्याचं दिसून येत आहे. ही अतिशय खेदाची आणि चिंतेची बाब आहे. “मनावरचा ब्रेक; उत्तम ब्रेक’, असे फलक आपल्याला महामार्गांवर लावलेले बघायला मिळत असतात. आपल्या जीवनाची गाडी सुरळीत पुढे जात राहावी ह्यासाठी आपल्या मनावरचा ताबा स्वतःला मिळवता येणं गरजेचं असतं.
विचारांचा प्रचार नाही प्रसार महत्त्वाचा
अगदी प्राचीन काळापासून आपण स्वतःच्या विचारांचा आणि स्वतःच्या कीर्तीचा प्रसार करण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करत आलो आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ही त्या त्या व्यक्तीच्या विचारांवरूनच होत असते. हयातीत आणि नंतर सुद्धा विचारच शिल्लक राहतात. कायम विचारांची भूक असलेली माणसं विचारवंतांच्याच शोधात असतात. भेटणे, बोलणे, संपर्क करणे हे फक्त प्रारंभापुरतं निमित्तच ठरत असतं. आयुष्याच्या प्रवासात सोबत हवी असते, ती विचारांचीच. विचारांचा पाया मजबूत असलेल्या व्यक्तीच्या मानसिक कळसाची उंची मोजणे सहज शक्य होतंच असं नाही. अशा व्यक्तीपेक्षा त्या व्यक्तीच्या विचारांचंच आकर्षण, कौतुक आणि आदर अधिक असल्याचं दिसून येत असतं. ह्याची जाणीव आपण ठेवणं आवश्यक असतं. अशी वैचारिक प्रगल्भता प्राप्त करणाऱ्यांपैकी आपणही एक असायला काय हरकत आहे? असा विचार कधी येतो का हो आपल्या मनात? विचारवंतांच्या वैचारिक बैठकीत सामील व्हायला कसं मिळेल, ह्याच दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणं महत्त्वाचं ठरतं. कारण, अशा विचारवंतांच्या वैचारिक, मानसिक कळसाला स्पर्श करून येणारा प्रकाशाचा, आशेचा प्रत्येक किरण मार्गस्थ होण्यासाठी अनेकांना योग्य दिशा दाखवत असतो. दशदिशांपैकी कोणत्याही दिशेने मार्गस्थ झालं, तरीही यश प्राप्तीच्या मार्गाचं दर्शन होतंच राहतं.
आचरण करण्याअगोदर विचारांना पाचारण करावं
काहीवेळा आपल्या आपापसातील संवादाची सुरुवातच विसंवादानं होत असल्याचं दिसून येतं. विचारांचा अभाव हे खरं तर त्यामागचं मूळ कारण असतं. संवादाचा अभाव हे माणसामाणसांत दुरावा निर्माण होण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण असतं. ह्यामध्ये अनेकदा वर्तनापेक्षा विचारांना महत्त्व आणि प्राधान्य कमी दिलं जात असतं. विवेकी विचार न करताच आचरण केलं जातं, कृती केली जाते; काहीवेळा ती तापदायक, घातक ठरू शकते. अलीकडच्या काळात विभक्त कुटुंब, कौटुंबिक कलह आणि निर्माण झालेले क्लेश, द्वेष ह्यामुळे बहिण-भाऊ, भाऊ-भाऊ, पती-पत्नी, पिता-पुत्र, सासू-सून यांच्यात विचारांचं आदान प्रदान होतंच असं नाही. रक्ताच्या नात्यात देखील अविचार आणि संवादाआभावी अनेक गैरसमज, समस्या निर्माण झाल्याचं दिसून येतं. आपली सुख-दु:ख, भाव-भावना, विचार-आचार, ह्या बाबींची देवाणघेवाण करायला वावच नसतो, असं नाही. परंतु विचारांच्या माध्यमातून सुखाच्या यशोशिखरांवर पोहोचण्यासाठी आपापसातील संवादालाच बगल दिली जाते. परस्परांमधील नातेसंबंध, आपलेपणाची भावना, जिव्हाळा, प्रेमाचा ओलावा कसा आणि कोण टिकवणार? हाच कळीचा मुद्दा आहे. खरं तर संवादाला “सु’ हे विशेषण लावून जगण्यापलीकडचं जीवन अधिकाधिक आनंदी करणं जरुरीचं असतं, असा प्रत्येकानं विचार करण्याची गरज असते. त्यासाठी आचरण करण्याअगोदर विचारांना पाचारण करावं लागत ह्याची जाणीव असायला हवी.
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका निराळी
एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती आपल्याला शोधूनही सापडत नाही. एखाद-दुसऱ्या गोष्टींमध्ये कदाचित साम्य असेल, पण व्यक्तिमत्त्वातील अगदी तंतोतंत सारखेपणा कधीच दिसून येत नाही. “व्यक्ती तितक्या प्रकृती’, असं नेहमीच आपण सर्वत्र अनुभवत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या विचारातच फरक असतो. अर्थात तो तसा आचार आणि संस्कारात देखील असतो. एखाद्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, सवयी, बोलण्याच्या सवयी, लकबी अगदी सगळ्यातच भिन्नता असते. ह्या भिन्नतेमुळे अनेकदा आपापसातील विचार, वर्तन आणि व्यवहारात कमी अधिक प्रमाणात समस्या भेडसावत असतात. ह्यासाठी एकमेकांचं ताळतंत्र, थोडं का होईना पण सांभाळायला लागतं. सर्वप्रथम संवादाचं महत्त्व समजून घेण्याची, शास्त्र अवगत करण्याची आवश्यकता असते. ह्या संवादात व्यक्तिगत विचार समाविष्ट झालेले असतात. खरं तर, ते विचारच अधिक महत्त्वाचे असतात. संवादाचं सुख ही ज्याची त्याने अनुभूती घेण्याची बाब असते. आपण स्वतःच भावनिक, मानसिक, आंतरिक आणि शारीरिक पातळीवर प्रत्येक संवाद घडवून आणायचा असतो. ह्या सर्वच बाबींचं समीकरण कसं मांडायचं हे ज्याला माहिती होतं, त्याला संवादात पूर्णपणे सहभागी होऊन त्या संवादाचं सुख प्राप्त करून घेता येतं. स्वतःचे विचार व्यक्त करण्यासाठी संवादासारखं प्रभावी माध्यम दुसरं कोणतंही नसतं. अनेकदा दोन व्यक्ती एकत्र येऊन संवादाच्या माध्यमातून आपापले विचार मांडतात जरूर, पण त्या संवादाचा हेतू तिसऱ्या व्यक्तीच्या निंदेचा असेल, तर केवळ अशा विचारांमुळे नकारात्मक वातावरणाचीच निर्मिती होत असल्याचं दिसून येतं. मुळातच प्रत्येकाची प्रश्नपत्रिका निराळी असते म्हणजे त्यांच्यात उणीव असते असं नाही. संवादाचं सुख प्राप्त करण्यासाठी सकारात्मक विचार, आचार आणि संस्कार अंगीकारण्याचीच गरज अधिक असते, ही जाणीव होणं महत्त्वाचं असतं.
संस्कारच देतात विचारांना आकार
संस्कारच आपल्या अंतर्मनाला शिस्त लावत असतात. एक विशिष्ट आकार, दिशा आणि गती प्राप्त करून देत असतात. मुळातच ह्या विचारांची व्याप्ती आपण समजून घेणं सर्वप्रथम जरुरीचं असतं. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अंतर्मनावरील संस्कार खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्याशिवाय आपल्या विचारांमध्ये परिपक्वता येतेच असं नाही. संस्काराशिवाय जीवनमूल्य शून्य ठरत असतं. संस्कारच आपल्याला श्रेष्ठ बनवत असतात, उत्तम आकार देत असतात. आपल्या सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. संस्कारांशिवाय जीवन भरकटलेल्या जहाजाप्रमाणे, विमानाप्रमाणे असतं, एकप्रकारे विमनस्क अवस्थेतील मन कोणतीही पातळी गाठू शकतं. संस्कार म्हणजे नेमकं काय असतं? खरं तर, संस्कार संस्कृतीनेच प्राप्त होत असतात. त्याचप्रमाणे, संस्कृती सुद्धा संस्कारांवर आधारित असते. संस्कार म्हणजे आपल्या अंतर्मनावर सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि उपयुक्त ठरतील अशा चांगल्या सवयी, असं म्हणता येईल. आपल्यामध्ये यासाठी आवश्यक ते सद्गुण असणं जरुरीचं असतं. अशा गुणांचा केवळ व्यक्तिगत लाभ होत नसतो, तर समाजातील प्रत्येक घटक लाभार्थी ठरत असतो. निरोगी, प्रगत समाज जीवनाकरिता उत्तम संस्कारित विचार असणं महत्त्वाचं ठरतं. एक आदर्श नागरिक निर्माण होण्याची सुरुवात घराघरातूनच व्हावी लागत असते, ह्याची जाणीव आपल्याला असणं आवश्यक असतं. चांगल्या सवयीचं, संस्काराचं महत्त्व पटवून घेणं सद्य:स्थितीत आवश्यक आहे. आपल्या दिनचर्येतील नियमितता, आहारनियमांचं पूर्ण पालन, खाण्यापिण्यावर नियंत्रण, शुद्ध आणि सात्त्विक आहार ह्या सर्व गोष्टी मनावरील संस्कारासाठी पूरक असतात, म्हणूनच आपल्या जीवनाकरिता आवश्यक असतात. शारीरिक, मानसिक पातळीवर आपल्या मनावरील संस्काराच्या दृष्टीनं ह्या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. सामाजिक स्वास्थ्यासाठी देखील ह्या उपयुक्त ठरतात. संस्कारातील शिस्त अनेकदा नको असते. त्यामुळे संस्कार स्वीकारण्यास अनेकदा काहीजणांचा छुपा विरोध असल्याचं दिसून येतं.
सकारात्मक विचार, आचार आणि संस्कार
ज्या व्यक्तीला सतत शुभ, सकारात्मक आणि आशावादी विचार करण्याची सवय असते, त्या व्यक्तीचं मन नेहमी आनंदानं आणि उत्साहानं भरलेलं राहतं. अशा उत्साही मनाच्या व्यक्तीला नेहमीच यशप्राप्ती होत राहते. सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असते, हे सिद्ध करणाऱ्यांपैकी आपणही एक का असू नये? ज्यायोगे आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकास गुरुकिल्लीद्वारे आपल्यासारखंच घवघवीत यश मिळत राहू शकतं. संपूर्ण जग सुंदर आहे, फक्त तसं पाहायला हवं; प्रत्येक नातं जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं; प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त तसं समजायला हवं. त्यासाठी ते समाधान आणि आनंद आपल्याला मिळत राहायला पाहिजे. म्हणूनच सकारात्मक विचार, आचार आणि संस्कार ह्याचं महत्त्व आपल्याला कळणं, अवगत होणं आवश्यक असतं. आयुष्याच्या अवघड शाळेत आपण कोणत्या वर्गात आहोत, परीक्षा कोणती हे ठाऊक नसतं. कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका निराळी असते. तरीही ह्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करणं हे आपापल्या सकारात्मक विचार, आचार आणि संस्कारांवर आधारित, अवलंबून असतं, ह्याची जाणीव सदोदित ठेवणं महत्त्वाचं असतं.
– प्रा. शैलेश कुलकर्णी