असं म्हणतात की, व्यक्तीने कसं सर्वगुणसंपन्न असायला हवं. मग अगदी लग्न करताना नवरा किंवा बायको बद्दल अपेक्षा करताना “सर्वगुणसंपन्नता’ हा एकच निकष लावून अपेक्षा बाळगली जाते. आईला सर्वगुणसंपन्न मुलगा हवा असतो, सासूला सर्वगुणसंपन्न सून हवी असते. नाती जरी वेगवेगळी असली तरी सर्वगुणसंपन्नतेचा नियम मात्र सर्वांनाच लागू असतो. मुळात सर्वगुणसंपन्नता म्हणजे काय? तर एकाच व्यक्तिमत्त्वामध्ये इतरांना अपेक्षित विशेष गुण असणे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर परफेक्ट असायला हवे. हिंदी सिनेमातील अमीर खानप्रमाणे(?). पण मुळात वर्षातून एखाद हिट सिनेमा तो देतो म्हणून त्याच्या उत्तम पटकथा निवडीवर त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट ही उपमा दिली जाते. परंतु या एका निकषावर व्यक्ती कसा परफेक्ट होऊ शकतो?
मुळात आपण अपेक्षीलेला गुण आपल्याला इतरात दिसला तर आपण त्याला खुल्या मनाने सर्वगुणसंपन्न हा किताब बहाल करतो. मुळात वरवरच्या निरीक्षणातून आपण एखाद्याबाबत तत्काळ मत व्यक्त करीत असतो. परंतु अपेक्षा भंग झाला की आपले निर्णय चुकले म्हणून पश्चाताप करीत बसतो. सर्वगुण संपन्नता म्हणजे नेमके काय तर, अशी व्यक्ती की जिच्यात सर्व गुण आहेत. जी व्यक्ती अनेक कला कल्पकतेत पारंगत आहे. जी व्यक्ती प्रत्येक काम योग्यरीत्या पूर्ण करते. ज्या व्यक्तीची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा काहीशी वेगळी आहे. थोडक्यात काय तर परिपूर्णता असणारी व्यक्ती. परंतु असे म्हटले गेले आहे की, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.
प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. व्यक्तींचा स्वभाव, आचरण, विचारपद्धती, मानसिकता, सवयी आणि दृष्टिकोन हा भिन्न असतो. जसजशा व्यक्ती बदलत जातात तसतसे त्यांचे स्वभाव, वर्तणूक, विचारक्षमता, जगाकडे पहायचा दृष्टिकोन सगळं काही बदलतं. त्यामुळे बदलता दृष्टिकोन आपल्याला प्रत्येकाच्या नजरेत परिपूर्ण म्हणून पाहिलंच असे नाही.
आपल्या नजरेतून आपण सर्वगुणसंपन्नतेची व्याख्या ठरवीत असतो. अगदी दोन जोडीदारांत अथवा सासू-सुना, पालक-मुले यात या सर्वगुणसंपन्नतेतून मतभेद झाल्याचे पाहायला मिळतात.
मला आठवतं, आमच्या शेजारच्या इमारतीतील जोशी काकू एके दिवशी आमच्या घरी आल्या. घरी आल्या आल्या त्यांनी त्यांच्या सुनेबद्दल वेडेवाईट बोलण्यास सुरुवात केली. तिला हेच जमत नाही, ती आमचे ऐकतच नाही, ऐकून न ऐकल्यासारखे करते, आपल्या अशा अनेक आरोपफैरी त्या झाडत होत्या. जोशी काकूंचा सुनेबद्दलचा तो कमालीच्या द्वेषभावनेचा आवेश पाहून मी आश्चर्यचकित झालो. कारण जोशी काकूंच्या घरात पाच सहा महिन्यांपूर्वीच सून आली होती. लग्न ठरण्याच्या वेळी जेव्हा जोशी काकू मुलगी पाहून आल्या होत्या तेव्हा शेजाऱ्यांनी त्यांना, काय मग कशी वाटली हो मुलगी? असे विचारले होते. त्यावेळी मात्र जोशीकाकू तिच्याबद्दल इतके कौतुक करू लागल्या की सांगता सोय नाही. मला आठवलं जोशी काकूंनी त्यावेळी तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगताना एका शब्दांत वर्णन केले होते. आणि तो शब्द म्हणजे “सर्वगुणसंपन्नता’.
परंतु पाच सहा महिन्यांत असे काय झाले की जोशी काकूंना आता तिच्यातील एकही गुण दिसेना. एकेकाळी काकूंना हवी तशी असणारी त्यांची सून त्यांना आता दुश्मनासारखी का वाटू लागली? असे अनेक प्रश्न मनात येऊन गेले. मात्र बराच वेळ त्यांच्या तोंडून तिच्याबाबत असणाऱ्या तक्रारी ऐकल्यावर मला एक गोष्ट उमगली. माणूस तोपर्यंतच एखाद्या व्यक्तीतील सर्वगुणसंपन्नतेची भरभरून स्तुती करतो जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागते. परंतु जसे त्या व्यक्तीकडून एखादी गोष्ट अपेक्षेपेक्षा कमी-जास्त झाली तसे त्या व्यक्तीतील केवळ दोष दिसू लागतात.
थोडक्यात सांगायचे तर जोपर्यंत आपले चांगले दिवस आहेत तोपर्यंत दगडालाही देवपण देतो. अगदी नित्यनेमाने देवाची पूजा करतो. परंतु दिवस फिरताच नास्तिकपणाचा आव आणत त्याच देवाला दोष द्यायलाही कमी करत नाही.
मुळात कोणाला देवपण द्यायचे हे व्यक्ती आपल्या मर्जीनुसार ठरवित असतो. अनेकदा आपले सद्वर्तन हे इतरांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षांवरून ठरत असते. बरेचदा आपणही इतरांबाबतचा दृष्टिकोन हा आपल्या अपेक्षापूर्तीवरून ठरवीत असतो. अनावश्यक अपेक्षांच्या भाऊगर्दीत व्यक्ती स्वतःही आनंदित राहू शकत नाही आणि इतरांनाही आनंद देऊ शकत नाही. म्हणूनच इतरांना समजून घेणे, पूर्वग्रहदूषितपणा न ठेवणे आणि कधीतरी त्यांच्या नजरेतून त्या गोष्टीकडे पाहणे हिताचे ठरते. अवास्तव अपेक्षा करून इतरांना नाकारण्यापेक्षा स्वतःच्या दृष्टिकोनात बदल करून आनंद स्वीकारणे केव्हाही चांगलेच. हा एक गुण जरी आपण अंगी बाळगला तरी आपण सर्वगुणसंपन्नतेकडे वाटचाल करतोय, असे म्हणायला हरकत नाही.
सागर ननावरे