सोशल मीडियावर स्पर्धा; आरोग्यदायी सांगण्यात चढाओढ
बारामती- करोना विषाणूच्या उद्रेकामुळे देशभर घबराट पसरली आहे. त्यातच चिकनमुळे हा विषाणू पसरतो, अशी अफवा सोशल मिडियावरून वाऱ्यासारखी पसरली. उच्चस्तरीय अधिकृत संस्थांनी त्यासंबंधीची स्पष्टीकरणे दिलेली आहेत. आता चिकन उत्पादक कंपन्यांमध्ये आपले चिकन कसे आरोग्यदायी आहे, हे सांगण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली आहे. सोशल मिडियावर ही अहमिका पाहायला मिळत आहे.
करोनाच्या अफवांमुळे पोल्ट्री उत्पादनांची मागणी झटक्यात तळाला गेली. वास्तविक पाहता चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारीपर्यंत कच्च्या मालाचे दर अधिक असल्यामुळे पोल्ट्री उद्योग यापुर्वीच आर्थिक अडचणीत होता. त्यात करोनाच्या अफवेचा दणका बसल्यामुळे पोल्ट्री उद्योग अक्षरशः दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.
ग्रामीण अर्थकारणातील उलाढालीत पोल्ट्री उद्योगाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र हे त्यातील आघाडीचे नाव. राज्यातील सुमारे 90 टक्के पोल्ट्री व्यवसाय हा इंटिग्रेशन मॉडेलवर (कंत्राटी पध्दत) चालतो. त्यामध्ये पोल्ट्री कंपनी शेतकऱ्यांना कोंबड्यांची एका दिवसाची पिल्ले आणि खाद्यही पुरवतात. शेतकरी ही पिल्ले 40 ते 45 दिवस वाढवून कंपनीला परत देतात. सध्याच्या बॅचच्या पक्ष्यांपोटी कंपन्यांकडून मिळणारे पेमेंटही रखडले आहे.
दररोज 125 कोटींचा फटका
देशभरात पोल्ट्री उद्योगातून दररोज साधारण एक कोटी ब्रॉयलर कोंबड्या उपलब्ध होतात. एका कोंबडीचा उत्पादन खर्च आहे सुमारे 150 रूपये. परंतु, सध्या एक कोंबडी 80 ते 100 रूपयालाच विकली जात आहे. प्रत्येक कोंबडीमागे दररोज सव्वाशे रूपयांचा तोटा सहन करावा लागतो. परिणामी देशातील पोल्ट्री उद्योगाला दररोज सव्वाशे कोटी रूपयांचा थेट फटका बसत आहे.
सोशल मिडियावर जाहिराती…
अंड्यांच्या किंमतीही पावणेचार रूपयांवरून सव्वा तीन रूपयांवर आल्या आहेत. त्यामुळे ब्रॉयलरप्रमाणेच लेयर पोल्ट्रीही तोट्यातच आहे. मात्र, चिकनला उठाव मिळावा याकरिता चिकन महोत्सवाला तोबा गर्दी होत आहे.
आता, आघाडीच्या चिकन उत्पादक कंपन्या आपल्या चिकनचे आरोग्यदायी महत्व गिऱ्हाईकांच्या मनावर बिंबविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. सोशल मिडियावर हे जाहिरात युद्ध पहायला मिळत आहे. मात्र. त्यामधून फारसे काही निष्पन्न होताना दिसत नसल्याचे वास्तव आहे.