सरकारी कार्यालयांवर कोंबड्या सोडण्याचा इशारा
मंचर -पोल्ट्री व्यवसायातील सर्वांत वाईट दिवस सद्यःस्थितीत पोल्ट्रीचालक अनुभवत असताना सरकार मात्र पोल्ट्रीचालकांच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. येत्या आठवडाभरात सरकारने पोल्ट्री चालकांना भरीव आर्थिक अनुदान जाहीर न केल्यास तहसील कार्यालय, जिल्हा अधिकारी कार्यालय आणि मंत्रालयावर ब्रॉयलर कोंबड्या सोडून सरकारचा निषेध करणार आहे, असा इशारा पोल्ट्री व्यावसायिक आणि भाजपचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख जयसिंगराव एरंडे यांनी दिला.
गेल्या एक महिन्यापासून करोनाने धुमाकुळ घातला आहे; परंतु करोना आणि कोंबड्यांचा कोणताही संबध नसतानाही समाज माध्यमांवरील चुकीच्या माहितीचा धसका चिकन खवय्यांनी घेतला, त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय अक्षरशः ठप्प झाला आहे. 50 ते 60 दिवसांचे अडीच ते तीन किलो वजनाच्या ब्रॉयलर कोंबड्या खरेदीसाठी व्यापारी येत नाह, त्यामुळे मातीमोल भावाने कोंबड्यांची विक्री करण्याची वेळ पोल्ट्री चालकांवर आली आहे.
पोल्ट्री व्यावसायिकांवर ही आपत्ती आल्याने सरकारने तातडीने पोल्ट्री व्यवसायांना आर्थिक मदत जाहीर करावी. अन्यथा पोल्ट्री व्यवसायिक मंत्रालयावर मोर्चा आणून कोंबड्या सोडण्याचे आंदोलन करतील, असा इशारा पोल्ट्री व्यावसायिक आणि भाजपाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख जयसिंगराव एरंडे यांनी दिला.