मुंबई : संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरें यांच्यावर सडकून टीका केली आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या असा आरोप आखरे यांनी केला आहे. तसेच राज ठाकरेंनी वाटेल ते बोलून महाराष्ट्राला वेठीस धरु नये असे आवाहनही आखरे यांनी केले आहे.
एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना आखरे यांनी कठोर शब्दात राज यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. तसेच त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी देखील एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेलं इतिहास लेखन हे दंगलीचं स्त्रोत पसरवणारं लेखन आहे. त्या माध्यमातूनच दंगली या महाराष्ट्रात झाल्या होत्या. पण आपण जरी दंगली घडवत असला तरी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाच्या विचारधारेमुळे या महाराष्ट्रातील दंगली थांबलेल्या आहेत,” असे आखरे म्हणाले आहेत.
“तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्हाला जे तुमचे खरे इतिहास अभ्यासक, संशोधक वाटतात त्यांना तुम्ही बोलवा आम्ही आमचे अभ्यासक आणि संशोधक बोलवून एक चर्चा सत्र घडवू. आम्ही निश्चित सांगू शकतो की तुम्हाला सत्य इतिहासाचं दर्शन घडवू शकतो. तुम्हाला जे संदर्भ हवे आहेत ते सत्य आणि ऐतिहासिक संदर्भ देऊन आम्ही इतिहास मांडू.
तुम्ही हिंमत दाखवा आणि चर्चासत्र बोलवा. वायफळ चर्चा आणि उगाच जिभेला आलं असं बोलून उगाच महाराष्ट्राला वेठीस धरु नका. महाराष्ट्र पुरोगामी असून महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा आहे. तिचं जतन करण्याचं काम आजपर्यंत आम्ही केलं आहे,” असा दावाही आखरेंनी केला आहे.