कोल्हापूर – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा असली तरी राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भाजप खूप आधीपासून मांडत आहे. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे हे हिंदुत्वाचे मुद्दे मांडत आहेत. परंतु, भाजप आणि भाजपाचे कार्यकर्ते ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेतात तो संघ हिंदुत्वाचे हे मुद्दे सुरुवातीपासून मांडत आहे. राम मंदिर, समान नागरी कायदा, काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे, नागरिकत्व कायद्यात सुधारणा हे मुद्दे भाजपा सुरुवातीपासून मांडत आहे. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे.
उद्धव ठाकरे भाजपाच्या हिंदुत्वाबद्दल काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही, तर सामान्य माणूस काय म्हणतो हे महत्त्वाचे आहे. या देशातील हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भाजपाने काय कार्य केले आहे याची सामान्य लोकांना जाणीव आहे.
कॉंग्रेस पक्षाच्या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली तर शिवसेनेची आघाडी सरकारमधून बाहेर पडायची हिंमत का होत नाही, असा सवाल त्यांनी केला.