चंदीगड : हरियाणाच्या नूह जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर काही प्रमाणात वातावरण निवळले असल्याचे दिसत असतानाच आता पुन्हा एकदा याठिकाणी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याठिकाणी हिंदूत्ववादी संघटनांनी कोणत्याही परिस्थिती २८ तारखेला धार्मिक मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मोबाईल इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ३१ जुलै रोजी नूह जिल्हात ब्रिज मंडल अभिषेक यात्रा काढण्यात आली होती. यादरम्यान दोन जमावामध्ये संघर्ष झाला होता. जवळपास ७-८ दिवस जिल्ह्यासह राज्यात तणावाची स्थिती होती. त्यानंतर काही हिंदू संघटनांनी पुन्हा एकदा २८ तारखेपासून ही मिरवणूक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस प्रशासनाने मिरवणुकीसाठी परवानगी नाकारली आहे, तरी हिंदू संघटनांनी मिरवणूक काढण्याचा निर्धार केला आहे.
याठिकाणी संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते. खबरदारी म्हणून पोलिस प्रशासनाने आवश्यक ते पाऊल उचलले आहेत. या दिवशी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.त्यामुळे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते, यासाठी पोलिस खबरदारी घेत आहेत. व्यायसायिक कामासाठी वापरली जाणारी इंटरनेट सेवा सुरु असणार आहे. २८ ऑगस्टच्या रात्री बारा वाजल्यापासून आदेशाचे पालन होईल.
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की, ‘३१ जुलै रोजी थांबवावी लागलेली ब्रिज मंडल अभिषेक यात्रा पुन्हा सुरु करण्यासाठी सर्व तयारी झालेली आहे.’ विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र जैन म्हणाले, ‘काहीही झालं तरी मिरवणूक काढली जाणारच. नियोजनानुसार मिरवणूक निघेल. तो आमचा अधिकार आहे. आमची सुरक्षा ही प्रशासन आणि पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं. आम्ही मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या नियंत्रित करु, पण यात्रा निघणारच.’ या निर्णयावर संघटना ठाम असल्याची माहिती समोर आली आहे.