भाजप सारवासारव करत असल्याचा आरोप
पिंपरी – स्मार्ट सिटी सर्व्हरवर सायबर हल्ला प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. तरी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.
संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रात म्हटले आहे, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची तक्रार टेक महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे दिली आहे. या तक्रारीत सायबर हल्ल्याद्वारे अज्ञात व्यक्तीने सर्व्हरमधील डाटा इन्क्रिप्ट करून बिटकॉईनद्वारे पैशाची मागणी केल्याचे म्हटले आहे. या सगळ्यात पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावाही संबधित कंपनीने केला आहे.
स्मार्ट सिटी कंपनी स्थापनेपासून शहर स्मार्ट करण्याच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची कामे काढली गेली. केंद्र सरकारच्या नावावर प्रकल्प असला, तरी पालिकेच्या तिजोरीतून मोठा खर्च होत आहे. शहर स्मार्ट करण्यासाठी टेक महिंद्रा कंपनीला दिलेले काम सुमारे चारशे कोटींहून अधिक रकमेचे आहे. या कामातील हलगर्जीपणामुळे झालेला सायबर हल्ला गंभीर आहे.
स्मार्ट सिटी सर्व्हरवर सायबर हल्ला होऊन डेटा चोरीसारखा प्रकार म्हणजे शहरवासियांची सुरक्षितता धोक्यात आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे काम व गलथान कारभार सुरू आहे. सत्य समोर येण्यासाठी संबधित कंत्राटदार, सहकंत्राटदार कंपन्यांचे कनेक्शन तपासणे गरजेचे आहे.
पोलिसात तक्रार दिल्यानतंर हा प्रकार उजेडात आला. तोपर्यंत स्मार्ट सिटी कंपनीचे व्यवस्थापन काय करत होते, कामावर कंपनीचे नियंत्रण नाही का, सल्लागारी संस्था काय करतात आणि कंपनी अधिकाऱ्यांनी भूमिका मांडण्याऐवजी भाजप पदाधिकारी का बाजू मांडत आहेत, असे प्रश्न वाघेरे यांनी उपस्थित केले आहेत. भाजपचा या प्रकारावर सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे उच्चस्तरीय चौकशीची मागणी वाघेरे यांनी केली आहे.