नगर – नगर जिल्ह्यासह राज्यातील बहूतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार गारपीट व वादळी पावसाने शेतपिकांचे, घरांचे व अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सलग पंधरा दिवसात दुसऱ्यांदा शेतकऱ्यावर संकट आले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीची मदत करावी आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे केली आहे.
दहातोंडे यांनी नेवासा तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. शेतकरी गेल्या वर्षभरात सातत्याने संकटात आहे. गेल्यावर्षी अतीवृष्टीने प्रचंड नुकसान झाले असताना त्याची मदत अद्याप मिळाली नाही. पंधरा दिवसापूर्वी झालेल्या वादळी पाऊस व गारपीटीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. त्याबाबत ही अद्याप हालचाली नाही.त्यात दोन दिवसांपासून सतत गारपीट, वादळी पाऊस होत आहे. त्याचा फळपिकांना मोठा फटका बसला आहे. तर कांदा पिक चांगल्या स्थितीत असताना कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतपीकाला दर नाही. त्यात या पावसाने व गारपीटीने भाजीपाल्याचे वाताहात केली. अनेक शेतकऱ्यांच्या घराचे, गोठ्याचे नुकसान झाले असताना सरकारची मदतीची भूमिका दिसेना, केवळ आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी एवढेच वारंवार सांगितले जात आहे. सततचा पाऊस, गारपीट, वादळ व होणारे नुकसान यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज अससल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने मदत करावी व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी संभाजी दहातोंडे यांनी केली आहे.
दरम्यान, रविवारी सायंकाळी नगर शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.