अजित पवार : कर्जमुक्ती योजना 3 महिन्यांत पूर्ण करणार
मुंबई : महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जात आहे. या योजनेतंर्गत अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनाही वंचित ठेवण्यात येणार नाही. त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल याची सरकार काळजी घेईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले. तसेच कर्जमुक्ती योजनेंतर्गत तीन महिन्यांत शेतकऱ्यांना पैसे दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बबनराव शिंदे यांनी सोलापूर जिल्हयातील पिककर्जाचा विषय उपस्थित केला होता. ज्वारीच्या काढण्या आता सुरू झाल्या असून पीककर्ज कधी देणार असा सवाल त्यांनी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी सप्टेंबर 2019 ही तारीख आहे. पण ऑक्टोबर महिन्यांतही अतिवृष्टी झाली होती. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी देणार. कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवून या शेतकऱ्यांनाही लाभ देण्यात यावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली. भारत भालके यांनी शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बॅंकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा फायदा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षाच्या सर्व सूचना तपासून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.