जीनिव्हा : सातत्याने भारतविरोधी गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानची गुरूवारी संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क प्रमुख मिशेल बॅचलेट यांनी कडक शब्दांत कानउघाडणी केली. पाकिस्तानात धार्मिक अल्पसंख्याक सातत्याने हिंसाचाराचे लक्ष्य ठरत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेची बैठक सध्या येथे सुरू आहे. त्या बैठकीतील एका सत्रात याआधी पाकिस्तानने भारतविरोधी कांगावा केला. काश्मीरात मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोप त्या देशाकडून करण्यात आला. त्याला भारताने सडेतोड उत्तरही दिले.
आता थेट बॅचलेट यांनी पाकिस्तानला तीव्र शब्दांत फटकारले. पाकिस्तानात अल्पसंख्याकांशी भेदभाव होत आहे. त्यांच्या धार्मिक स्थळांवर सातत्याने हल्ले होतात. ईशनिंदाविषयक कायद्यात सुधारणा करण्याची सूचना पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मानवी हक्क यंत्रणांनी अनेकदा केली. मात्र, त्यात पाकिस्तान सरकारला अपयश आले. त्यामुळे पाकिस्तानात अल्पसंख्याक लक्ष्य ठरतात. त्या देशात मनमानीपणे अटकेची आणि खटल्यांची कारवाई केली जाते, असे त्यांनी म्हटले. पाकिस्तानात ईशनिंदा हा मुद्दा अतिशय संवेदनशील स्वरूपाचा आहे.
बऱ्याचदा व्यक्तिगत सूड उगवण्यासाठी ईशनिंदेविषयीच्या कायद्याचा पाकिस्तानात गैरवापर होतो, असा मानवी हक्क संघटनांचा आरोप आहे. त्यापार्श्वभूमीवर, बॅचलेट यांनी पाकिस्तानला खडसावल्याच्या घडामोडीला महत्व आहे.