नगर -गुरुवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाचे पाणी नगर-औरंगाबाद रस्त्यावरील मजुरांच्या पालात शिरले. अवघाचि संसार पाण्यात गेल्याने झोपडीत राहणाऱ्या महिला व पुरुषांना लहान मुलांसह रात्र जागून काढावी लागली. लॉकडाऊनमुळे आधीच रोजगार नाही. त्यात रोजच्या अन्नाची चिंता संपलेली नसताना आता निवाऱ्यानेही साथ सोडल्याने मजुराच्या पालांमधील महिला अन् मुलांच्याचाही डोळ्यात पाणी तरळले.
काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत कोसळलेल्या पावसाच्या पाण्याने घेरल्याने मजुरांची आता निवाऱ्यासाठीची धडपड सकाळपासून सुरु झाली आहे. त्यांचे प्रचंड हाल सुरु आहेत. रोजंदारी करुन उदरनिर्वाह करणारे साधारण तीस कुटुंबे येथे राहतात. रात्रीच्या पावसात ती उघड्यावर पडली. आज सकाळपासून
पाण्यातून संसारोपयोगी वस्तू काढण्याची त्यांची केविलवाणी धडपड सुरू होती. रात्रभर पाण्याजवळच लहान मुलांना अक्षरश: खांद्यावर घेऊन त्यांनी रात्र जागून काढली. चेहऱ्यावर नवी काळजी व भीतीचे सावट स्पष्ट दिसत होते.