मुंबई : राज्याच्या काही भागात चांगला पाऊस पडत आहे. तर काही भागात अद्यापही पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. दरम्यान, राज्यातील कोकणासह मुंबई, ठाणे परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्याचबरोबर नांदेड, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्या आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यातही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्याच्या काही भागासह पालघर ठाणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नांदेड शहरात रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. नांदेड जिल्ह्यात जवळपास 60 टक्के शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली आहे. शेतीला जसा आवश्यक आहे तसा पाऊस झाला आहे. तर यवतमाळच्या आर्णी येथे रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसाचे पाणी बाजार पेठेतील दुकानात शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे.
गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. गोंदिया शहराजवळून वाहणाऱ्या पांगोली नदीसह अनेक छोट्या नाल्यांना पूर आला आहे. यामुळं गोंदिया-आमगाव महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक छोट्या नाल्यांना पूर आल्यानं अनेक गावांचे संपर्क तुटले आहेत. पुलावरुन पाणी वाहत असताना नागरिकांनी प्रवास करू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.