पुणे – मान्सूनच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी राज्यात आगामी आठवड्यात तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे. राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. देशभरात अनेक भागांत कमाल तापमान चढे राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि विदर्भात उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे तापमान 40 अंशांच्या पुढे राहण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवटचा आठवडा उष्णतेचा जाणार आहे. या काळात अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक तापमान असणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांतील तापमानात वाढ होत आहे. राज्यात रविवारी सर्वाधिक तापमान हे नागपूरमध्ये तब्बल 46.5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्याचबरोबर चंद्रपूर, गोंदिया, अमरावती या भागांतील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या आसपास होते.
सोलापूर, उस्मानाबाद या भागांत कमाल तापमान 43 अंशांच्या आसपास होते. पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागांत सरासरीच्या दोन ते तीन अंशाने जास्त नोंदविले गेले. साताऱ्यात 40.1 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुण्यात रविवारी तापमान 40 अंशांच्या आसपास होते.पुढील दोन दिवसात शहरातील तापमानात आणखी एक ते दोन अंशाने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली.