आज गांधीजींच्या या म्हणण्याप्रमाणे आपल्या परिसरातील, पर्यावरणातील प्राण्यांना आदरयुक्त वागणूक देऊन, आपल्याला एक आदर्श समाज घडविण्याची गरज निर्माण झाली आहे. अलीकडील काळात देशात सर्वत्र मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस शिगेला पोहोचत आहे. याचे कारण आपणच आहोत. जंगलाची झालेली तोड, मानवाचा हस्तक्षेप व इतर कारणे ज्यामुळे वन्यप्राणी संपत चाललेत किंवा मानववस्ती लगत येऊन लागले आहेत. त्यापुढे प्राणी गावात आल्याच्या आणि दिसल्याच्या बातम्या तसेच मानववस्तीत आपत्कालीन परिस्थितीत अडकण्याच्या बातम्या आपल्याला नेहमीच चवीने दाखविल्या जातात. त्याचचं रूपांतर भीतीमध्ये होते व त्या प्राण्यासोबतचा संघर्ष वाढत आहे.
वन्यजीवांबाबत असलेली “भीती’ हे यामागील सर्वात मोठं कारण आहे. वन्यजीवाबाबत असलेल्या भीतीमुळे दिसता क्षणी तो आपल्याला नको ही भावना निर्माण होते. त्यातून त्या प्राण्याला पकडायला हवे असे वाटून, त्यानुसार प्रयत्न सुरू होतात. परिणामी तो प्राणीदेखील घाबरून बचावासाठी हल्ला करतो आणि सुरू होतो वन्यप्राणी-मानव संघर्ष. पुणे जिल्ह्यातील बिबटबाबत हीच परिस्थिती दिसते. या संघर्षाबाबत सांगायचे झाल्यास बऱ्याच वेळेला मोकळा बिबट दिसतो व लोक त्या पाठीमागे धावतात मारण्यासाठी. बिबट हा कुठे झाडावर किंवा उसात बसलाय किंवा मोकळा फिरतो अशा वेळेस सुद्धा लोक मारण्यासाठी मागे धावतात व विनाकारण संघर्ष वाढतो. पूर्वी जुन्नर, संगमनेर, नाशिक भागांत जास्त आढळणारा हा प्राणी आता सोलापूर, पंढरपूर, सातारा या भागांत सुद्धा दिसायला लागला. या भागातील लोकांना हा प्राणी नवीन असल्यामुळे तिथला संघर्ष अधिकच वाढायला लागला आहे.
बऱ्याच वेळेला मॉब मेंटॅलिटीमध्ये लोक बिबट पकडण्याचा निर्णय घेतात, मात्र यातून अनेकदा अपघात घडतात. कारण बिबट स्वतःच्या बचावासाठी प्रति हल्ला करणार व त्यात कोणाचा डोळ्यावर, मानेवर, कानावर किंवा अन्य शरीरावर इजा होऊ शकते. याच संघर्षामध्ये कायमचे अपंगत्व येऊ शकते. त्यामुळेच बिबट दिसल्यास अथवा बिबट विहिरीत पडलाय, घरात घुसला, चुकून फाश्यात अडकलेला किंवा कुठे अडकलेला असल्यास अनावश्यक धाडस करू नये, याऊलट वनविभागाला त्याबाबत कळवावे.
वास्तविक पाहता ज्याप्रमाणे आपल्याला राहण्याचा हक्क आहे, त्याप्रमाणे तो वन्यप्राण्यांनाही आहे, ही बाब अनेक लोक लक्षातच घेत नाहीत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्यातील प्रत्येक घटक महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच या घटकांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. इतकी साधी गोष्टदेखील लोकांना कळून घ्यावीशी वाटत नाही. त्यामुळेच “वन्यप्राण्याने हल्ला केला’ या शिर्षकाखाली प्राण्यांना गुन्हेगार बनविले जाते. परंतु, आपण नष्ट करत असलेल्या जंगलातील हे प्राणी राहणार कुठे हा विचारदेखील झाला पाहिजे. तसेच, वन्यप्राण्यांसोबत सहजीवनाचा मार्ग अवलंबिण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तरच महात्मा गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे आपला समाज एक आदर्श समाज बनेल.
– डॉ. अजय देशमुख पशुवैद्यकीय अधिकारी, माणिकडोह बचाव केंद्र, जुन्नर