शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान
– शंकर दुपारगुडे
कोपरगाव – तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबात संकटाची मालीका असावी अशी शंका येते. अतिवृष्टी झाली, गोदावरी नदीला पुर आला. पुन्हा अवकाळी पावसाने झोडपलं. गारपिट, वादळ, वारा, हवा, पाणी या आसमानी संकटाचा सामना करण्याची जणू सवय या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडल्यासारखे वाटते. या सर्व संकटांचा सामना करीत शेतकरी प्रसंगी लाखो रूपयांचे कर्ज काढून शेती, फळबागा फुलविल्या. त्यात आजून एका संकटाची कमी होती म्हणुन कि काय नशिबाने मानव निर्मित करोनाची भर टाकली आणि शेतात कष्टाने पिकवलेल्या फळबागा लॉकडाउनच्या काळात मातीमोल झाल्या. करोनाचा संसर्ग होवू नये म्हणुन देशासह राज्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले. रस्ते निर्मनुष्य झाले, बाजारपेठा ओस पडल्या, खरेदी विक्री मंदावली
नागरीकांनी करोनाच्या भितीने घरात कोंढून घेतले. कारखाने बंद झाले. रस्त्यावरचे फळविक्रेते गायब झाले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकवलेल्या द्राक्ष, पेरू, चिक्कुच्या फळबागामधील फळांना विक्री होईना,व्यापारी बागेतून माल घेवून जात नाहीत तर बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहक नाही, अशा स्थितीत फळबागेतील फळं जाग्यावर बागेत गळून पडून मातीमोल होत आहेत.
अनेक नैसर्गिक संकटातुन वाचवत पिकवलेल्या फळबागा करोनाच्या संकटाने उद्ध्वस्त झाल्या. लाखो रुपये एकरी लागवड, मशागत खर्च करून मोठ्या हिमतीने बागा जोपासल्या दोन पैसे मिळतील या आशेने स्वप्न पहाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नावर करोनाने पाणी फिरवले.
कोपरगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी ऊसाची शेती कमी करुन द्राक्षे, पेरु,चिक्कूच्या बागा केल्या. विषेशतः धामोरी, रवंदा, ब्राम्हणगाव, चासनळी, कारवाडी, येसगाव, टाकळी, माहेगाव, सांगवीभुसार, वडगांव या गावामध्ये फळबागा सर्वाधिक आहेत. एकट्या धामोरी गावात शेकडो एक्कर द्राक्ष पेरुच्या तसेच चिक्कू च्या बागांचे क्षेत्र आहे.या भागातील शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र पाण्या अभावी कमी करून ठिबक सिंचनाचा वापर करीत कमी पाण्यावर बागा जोपासल्या या भागातील द्राक्षे सातासमुद्रापार विक्रीसाठी पाठविले जातात. दर्जा व गुणवत्तेच्या जोरावर या भागातील द्राक्षांना विदेशी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. म्हणूनच शेतकरी फळबागांना जिवापाड जपतात. यावर्षी फळबागा फुलल्या तोडणीची वेळ दोन दिवसावर आली. अनेक मोठ्या कंपन्यासह व्यापाऱ्या बरोबर विक्री करार झाला. एकरी आठ ते दहा लाख रुपये उत्पन्न मिळणार असा अंदाज होता. पण अचानक आलेल्या करोनाच्या संकटाने लॉकडाउन झाले. ठरलेल्या कंपन्यानी व व्यापाऱ्यांनी फळबागातील माल घेण्यास नकार दिला. पिकलेले द्राक्षे, पेरु, चिक्कू गळून जमीनीवर पडून सडू लागले. तोडून स्वतः विकायचे झाले तरी तोडणीसाठी शेतकऱ्यांना मजूर नाहीत. सर्व बाजूने शेतकरी राजा अडचणीत सापडला.
डोळ्या देखत फळांची नासाडी, पडझड बघून शेतकरी पुरता कोसळला. हताश झालेला तालुक्यातील शेतकरी आता मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासकीय नियमावलीत बागायतदार शेतकऱ्यांना विषेश सवलत मिळेल, नुकसान भरपाईच्या नावाखाली मदत होईत का? पिक विमा कंपन्या मदतीला धावतील का? सरकार व प्रशासन यावर सकारात्मक विचार करेल का? असे प्रश्न बाधीत बागधारकांना पडले आहेत. तालुक्यातील यावर्षी ८२७ एक्कर क्षेत्रात द्राक्षांची लागवड करण्यात आली होती. पैकी ४८७ एक्कर क्षेत्रातील द्राक्ष बागांची तोडणी ही करोनाच्या संकटात आडकली. या बागांचा लागवड खर्च सरासरी ३ लाख रूपये एकरी प्रमाणे झाला. बागेतील मालाला उठाव नसल्याने काही व्यापारी कवडीमोल दराने मागणी करीत आहेत. त्या दरात काडतोडणीची मजुरी सुध्दा निघणार नाही इतकी वाईट स्थिती शेतकऱ्यांची झाली. तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे सरासरी ५० कोटी रूपयापेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे.
तालुक्यात १ हजार ६१२ एक्कर पेरुच्या बागा आहेत तर ४१२ एक्कर चिक्कुच्या बागा आहेत. काही बागा २५ ते ३० वर्षापासुन शेतकऱ्यांनी जोपासल्या आहेत. मेहनतीने पिकवलेल्या पेरू, चिक्कुला बाजारपेठेत करोनामुळे मागणी नाही. मालाला उठाव नसल्याने व्यापाऱ्यांनी बागाकडे पाठ फिरवल्याने बागेतील फळे गळून सडल्याने दुर्गंधी सुटली. यामुळे ५० कोटीचे नुकसान झाले. सर्व फळबागांचे मिळून तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोरोनामुळे शंभर कोटीच्या पुढे नुकसान झाले आहे.
फळबागाच्या नुकसानीमुळे शेतकरी रस्त्यावर आला आहे. नाशवंत माल असल्याने अनेक शेतकरी शहराच्या गल्लोगल्ली जावून विक्री करीत आहेत. करोनामुळे शहरासह सिमाभागातील रस्ते बंद असल्याने माल विक्रीसाठी अनंत आडचणीचा सामना करावा लागतो आहे. पोलीसांच्या काठ्या खावून फळांची विक्री करताना जीव मुठीत धरुन लपत छपत विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
धामोरी येथील शेतकरी नारायण बारकुजी मांजरे यांनी १३ एकर द्राक्षे, १२ एकर चिक्कु, पेरूची लागवड केली. महिंद्रा कंपनी बरोबर ७० रुपये किलो प्रमाणे द्राक्ष विक्री करार झालेला होता. कंपनीच्या सांगण्यावरून माल तोडणीची तयारी पुर्ण झाली. दुसऱ्या दिवशी लॉकडाउनचे करण कंपनीने पुढे करुन माल घेण्यास असमर्थता दाखवल्याने मांजरे यांचे १४० टन द्राक्षे बागेत लटपले. विदेशी निर्यातीच्या दर्जाचे द्राक्षे तयार करताना त्यासाठी त्यांच्या सुचने प्रमाणे औषध, पाणी, आकार ठरविला जातो. त्या द्राक्षांना आपल्या बाजारपेठेत मागणी कमी असते. अशा द्राक्षांचे बेदाने करता येत नाही. फक्त विदेशी ग्राहकांसाठीचे हे द्राक्षे बागे सडत असल्याने मांजरे यांचे द्रक्षासह इतर फळांचे मिळून एक कोटीचे नुकसान झाल्याने मांजरे यांच्या डोळ्यातून पाणी तरळत आहे.
धामोरी येथील तरुण शेतकरी योगेश अशोक वाणी यांची ४ एकर पेरु, ३ एकर चिक्कुची बाग अनेक वर्षापासुन जोपासली. लाखो रूपयांची गुंतवणूक करुन बाग केली. गुजरात, मुंबईच्या प्रमुख बाजारपेठेत यांच्या पेरू, चिक्कुला मागणी असते. यावर्षी ऐन तोडणीच्या काळात करोनामुळे विक्री थांबल्याने उभ्या बागेतील पेरु, चिक्कुचा जाग्यावर सडा पडला. विक्री अभावी वाणी यांचे २० लाखाचे नुकसान झाल्याने संपुर्ण परिवार आर्थिक अडचणीत सापडला आहेत.
तालुका कृषी विभागाच्या वतीने सध्याच्या स्थितीचा आढावा घेवून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागांचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे. करोनामुळे लॉकडाउन च्या काळात विक्री न झालेल्या फळबागासाठी विशेष तरतुद शासकीय स्तरावर सध्यातरी नाही. परंतू द्राक्षे बागायतदारांनी विक्री न झालेल्या द्राक्षांचे बेदाने करावे. बेदाने तयार करण्यासाठी लागणारे साहीत्य देण्याचा विचार कृषी विभाग करीत असल्याची माहीती कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी दिली आहे.