मुंबई :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद हे एका कोणाच्या कामगिरीवर मिळालेले नाही. हे एक सांघिक यश असून आम्ही सगळ्यांनी केलेल्या कठोर मेहनतीचेच हे फळ आहे, अशा शब्दांत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपले मत व्यक्त केले.
आम्ही बांगलादेशविरुद्धचा सामना गमावल्यावरही विजेतेपदाचा विश्वास बाळगून होतो. याचे मुख्य कारण म्हणजे संघातील प्रत्येक खेळाडू किती मेहनत घेत होता ते मी पाहात होतो व त्याचे रूपांतर विजेतेपदात झाले. संघातील फलंदाजांनी जबाबदारीने कामगिरी तर केलीच; परंतु सर्वात जास्त कौतुक गोलंदाजांचे आहे. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती आगामी विश्वकरंडक स्पर्धेसाठी अन्य संघांना एक प्रकारे इशारा देणारीच ठरणार आहे, असेही रोहित म्हणाला.
अंतिम सामन्यात महंमद सिराजने स्वप्नवत गोलंदाजी केली. त्याचे डावातील चौथे षटक तर सर्वात यशस्वी ठरले. ते चार बळी एकाच षटकात मिळवले यावर अद्याप विश्वास बसत नाही. त्याने चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग केला. त्याला खेळपट्टी व वातावरणाचा लाभ तर झालाच; परंतु त्याने प्रत्येक चेंडू टाकताना वेगात जे बदल केले त्यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांच्या मनात गोंधळ निर्माण झाला. सिराजचा तो स्पेल मी कधीही विसरू शकणार नाही. या एका स्पेलमुळे त्याच्या जागतिक दर्जाबद्दल सर्व शंका दूर झाल्या व येत्या काळात जसप्रीत बुमराहच्या जोडीने तो देखील भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज बनलेला दिसेल, असा विश्वासही रोहितने व्यक्त केला.
ऑफ दी पिच स्विंगची क्षमताा..
सिराजकडे एक प्रभावी अस्त्र आहे. हवेची मदत घेत स्विंग मिळतोच; परंतु सिराज ऑफ द पिच स्विंग गोलंदाजीही करू शकतो. हेच त्याने या अंतिम लढतीत सिद्ध केले. त्याच्याकडे फसवा वेग आहे, त्यातच जर चेंडू स्विंग होत असेल तर जगातील कोणताही फलंदाज त्यावर मुक्तपणे आक्रमक फलंदाजी करू शकत नाही. श्रीलंकेचे फलंदाज त्याच्या याच ऑफ द पिच स्विंग चेंडूंच्या जाळ्यात अडकले, असेही रोहित म्हणाला.
कुलदीपचेही केले कौतुक..
या मालिकेमुळे डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याच्याही कारकिर्दीला कलाटणी मिळाली. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध अफलातून कामगिरी केली होती. मात्र, आशिया करंडक हे त्यापेक्षा मोठे व्यासपीठ होते, तेथेही कुलदीपने मोक्याच्या क्षणी बळी घेत आम्हाला सामने जिंकून दिले. त्याची कारकीर्द किती लांबेल अशी शंका अनेक जण उपस्थित करत होते. मला वाटते आशिया करंडक स्पर्धा त्याच्या कारकिर्दीला नवी उंची व कलाटणी देणारी ठरली आहे, असेही रोहितने सांगितले.
श्रीलंका मंडळ व ग्राउंड्समनला सलाम…
या स्पर्धेचे आयोजन श्रीलंका क्रिकेट मंडळाने पाकिस्तान क्रिकेट मंडळासह हायब्रीड पद्धतीने केले होते. त्यातही श्रीलंकेत सातत्याने पाऊस पडत होता. अशा वेळी श्रीलंका मंडळाने दाखवलेली तत्परता खरोखरच कौतुकास्पद आहे. तसेच त्यांचे सगळे ग्राउंड्समन सामना सुरू व्हावा यासाठी जे अथक प्रयत्न करत होते त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांच्याच प्रयत्नांमुळे अनेक सामने रद्द व्हायचे वाचले. म्हणूनच त्यांच्या मेहनतीला सलाम करावासा वाटतो, असेही रोहितने म्हटले आहे.