नवी दिल्ली – भारतीय संघाचा टर्बनेटर म्हणून संबोधला जात असलेला व नुकतेच काही दिवसांपूर्वी निवृत्ती घेतलेल्या ऑफ स्पीन गोलंदाज हरभजन सिंगने बीसीसीआय तसेच काही खेळाडूंना लक्ष्य केले आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी वशिलेबाजी चालते, असा आरोप त्याने केला आहे. अर्थात हरभजनला निवृत्तीनंतरच कसे तोंड फुटले, अशा शब्दांत नेटिझन्सने त्याला ट्रोल केले आहे.
– धोनीविषयी काहीच तक्रार नाही
– बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमुळे नुकसान
– मला 2015 सालापर्यंत खेळायचे होते
– निवड समितीने जाणूनबुजून दुर्लक्ष केले
– वशिला नसल्यानेच सातत्याने डावलले
रवीचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव यांच्या उदयानंतर निवड समितीने वय वाढत चाललेल्या हरभजनला फारशी संधी दिली नाही. त्याने आयपीएल व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्पर्धेत सहभागही घेतला नव्हता व चमकदार कामगिरीही केली नव्हती. मात्र, त्याने बराच काळ संघात पुनरागमन करण्याच्या प्रतीक्षेत घालवला व अखेर आपली निवृत्ती जाहीर केली. यानंतर त्याने बीसीसीआयवर टीका करण्याचा सपाटाच लावला आहे.
बीसीसीआयमधील काही अधिकारी संघ निवडीत विनाकारण हस्तक्षेप करतात, असा आरोप त्याने काही दिवसांपूर्वी केला होता. आता संघ निवडीसाठी वशिलेबाजीही चालते, असाही आरोप त्याने केला असून, बीसीसीआयचा उल्लेख करताना केणत्याही खेळाडूचे नाव घेतलेले नाही. मला खरेतर संघाचा कर्णधार होण्याची संधी चालून आली होती. मात्र, अशाच एका अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे ही संधी मिळाली नाही.
मी आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करताना केलेली कामगिरी तत्कालीन निवड समितीने ग्राह्य धरली नाही. बीसीसीआयमध्ये माझा कोणताही वशिला नव्हता. बीसीसीआयमध्ये ज्या व्यक्तीचा दबदबा असतो, त्याच्या गुडबुकमध्ये जो खेळाडू नसेल, त्याला माझ्यासारख्याच परिस्थितीचा सामना करावा लागतो, असेही आपल्या आरोपात हरभजनने म्हटले आहे.