पुणे – यावर्षी आपण सर्वजण आपला 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. सध्या देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून ‘हर घर तिरंगा’अभियान राबवण्यात येत आहे.
या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मागच्या वर्षी देखील ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवण्यात आले होते. देशभरातून या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, या कालावधीत राबविण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्र, रास्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन बाबींशी निगडीत यंत्रणांद्वारे ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.
दिनांक 13 ते 15 ऑगस्टदरम्यान राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, सर्व संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत घरोघरी दररोज संध्याकाळी झेंडा उतरविण्याची गरज नाही. तथापि, कार्यालयांना यासंबंधी ध्वजसंहिता पाळावी लागणार आहे.
पंतप्रधान मोदींनी केलं होतं आवाहन…..
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्ऱधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ या अभियानाची घोषणा केली होती. यावेळी देशभरातील जनतेला त्यांच्या घरावर किंवा कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये तिरंगा विक्रीही करण्यात आली.