पुणे – राज्याच्या राजकीय पटलावर काल घडलेल्या महानाट्याने विविध पक्षांतून विविध सूर उमटत आहेत. काही आनंद व्यक्त करीत आहेत, तर कुठे अस्वस्थता अन् त्रागाही व्यक्त केला जात आहे. पक्षांच्या शहर प्रमुखांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया…
अरविंद शिंदे (शहराध्यक्ष, कॉंग्रेस) – “महाविकास आघाडी अजूनही आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी म्हणून अधिक ताकदीने लढू. राज्यातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आघाडीतूनच निवडणुका लढवू.’
जगदीश मुळीक (शहराध्यक्ष, भाजप)- “अत्यंत चांगला निर्णय आहे. राज्याच्या विकासाला अधिक चालना मिळेल. महापालिकेसह एकूणच सर्व निवडणुकांना त्याचा फायदा होईल. “अकेला देवेंद्र क्या करेगा’ असे विचारणाऱ्यांना यातून उत्तर मिळालेच असेल की, देवेंद्रही सबकुछ करेगा’.
विजय कुंभार (आम आदमी पक्ष)- आजच्या या घोडेबाजारामुळे महाराष्ट्रातील राजकारण किती रसातळाला गेले आहे, याची प्रचिती येते. हा एकूणच प्रकार लोकशाहीला घातक असून, मतदारांनी दिलेल्या मताशी प्रतारणा करणारा आहे. यामुळे लोकशाहीच्या मूळ उद्देशाला सुरूंग लागला आहे. मतदाराने दिलेले मत निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी धडाधड विकत आहेत आणि पुन्हा आपण लोकशाहीचा कसा सन्मान करतो, हे सांगत असतात, हेच आजच्या घटनेतून दिसून येते.’
अंकुश काकडे (प्रवक्ता, राष्ट्रवादी कॉंग्रेस) – “अशी काही घटना घडणार आहे याची अजिबातच माहिती नव्हती. पवारसाहेबांनी पत्रकार परिषदेत सगळी इत्यंभूत माहिती सांगितली. कदाचित सुप्रियाताईंकडून त्यांना माहिती मिळाली असण्याची शक्यता आहे. छगन भुजबळांनी केवळ साहेबांना सांगितले होते की, मुंबईत काही घडण्याची शक्यता आहे, परंतु त्यापेक्षा आणखी काही सांगितले नाही. पवारसाहेबांबरोबर ज्यांनी 30-40 वर्षे काम केले आहे, त्यांनीही पवारसाहेबांना अंधारात ठेवून हे काम केले आहे. आजचा दिवस पवारसाहेबांच्या आयुष्यातील अत्यंत क्लेषकारक आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षात असंतोष होता; परंतु ते इथपर्यंत जाईल, असे कोणाला वाटले नाही. या घटना कशा झाल्या, काय झाल्या, देशाचे, महाराष्ट्राचे राजकारण कशाच्या दबावावर केले जात आहे, हे जाणकार जाणतात. आमच्या प्रदेशाध्यक्षांनीही त्याचा खुलासा केला आहे. आमच्या पक्षाचा याला पाठिंबा नाही. दोन महिन्यांपूर्वी चर्चा झाली होती की, पक्षातील काही ज्येष्ठ मंडळी वेगळ्या विचारांमध्ये आहेत. तेव्हा पवारसाहेबांनी सांगितले होते की, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या, मी तुमच्या निर्णयाआड येणार नाही, आणि मी तुमच्याबरोबर नसेन. माझ्या पायाला भिंगरी बांधली आहे. संपूर्ण महाराष्ट्र मी ढवळून काढेन. कारण यापूर्वी असे अनुभव मला दोनदा आले आहेत, असे पवारसाहेबांनी सांगितले आहे. आम्हाला खात्री आहे की पवारसाहेब काहीही करू शकतात.’
प्रमोदनाना भानगिरे (शिवसेना, शिंदे गट) :”या घटनेचे स्वागतच आहे. डबल इंजिनचे आता ट्रिपल इंजिन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल. शिंदेसाहेबांच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार उत्तम कामगिरी करेल आणि सन 2024 लाही शिंदेच मुख्यमंत्री असतील.’
संजय मोरे (शिवसेना, ठाकरे गट)- “भाजपमध्ये जाताना जी दूषणे उद्धवसाहेबांना लावली, त्यांनाच आज मांडीवर बसवले आहे. आता अलिबाबा आणि हे चाळीस चोर सत्तेतून बाहेर पडणार का, आणि फडणवीसांना मुख्यमंत्री होण्यासाठी हा टेकू आहे का? त्यामुळे सत्तेसाठी धोरण बदलणारे शिंदे, फडणवीस आणि पवार या तिघांनी एकमेकांची विचारधारा स्पष्ट करावी.’