नगर – जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणांचा त्रास जिल्हा परिषदेमध्ये ये-जा करणाऱ्यांना नेहमीच होतो. अतिक्रमणधारकांना त्याबाबत अनेकदा समज दिली. मात्र, त्यांनी कानाडोळाच केला. वैतागलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने अखेरीस महापालिका प्रशासनास विनंती केली. त्यानुसार महापालिकेनेही तातडीने दखल घेऊन ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली. मात्र हे पथक पुढे जाताच पुन्हा अतिक्रमणे झाली. त्यावर आज पुन्हा हातोडा मारण्यात आलेला आहे.
जिल्हा परिषद इमारतीच्या बाजूने संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या इमारतीत जाण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यांतील दोनच सध्या वापरात आहेत. तिसरे प्रवेशद्वार अतिक्रमणांमुळे बंद ठेवण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीला लागूनच सुमारे 40 जणांनी व्यवसाय थाटले आहेत. यामध्ये फळविक्रेते, चहाच्या टपऱ्या, भेळविक्रेत्यांचा समावेश होता. सोमवारी (ता. पाच) रोजी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने या विभागात कारवाई करून सर्व अतिक्रमणे हटविली होती. हे पथक महापालिके जाऊन पोहचत नाही तेच या परिसरात फळविक्रेते व इतर दुकानदारांनी या परिसरात आपली दुकाने थाटली.
या अतिक्रमणांचा अडथळा ठरत असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने महापालिकेच्या उपायुक्तांशी व अतिक्रमण विभागाशी याबाबत चर्चा केली. या चर्चेत अतिक्रमण हटविण्याबाबत निर्णय झाला. त्यानंतर हे अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने दुपारी साडेतीनच्या सुमारास हटविले. मात्र हे अतिक्रम फक्त गेट नंबर नंबर एक ते गेट नंबर दोन या दरम्यानचे हटविण्यात आलेले आहे.
जिल्हा परिषदेच्या संरक्षण भिंतीबाहेर आमचे व्यवसाय आहे. या व्यवसायावरच आमचा उदरनिर्वाह असल्यामुळे आम्हाला येथून हटवू नये, असे साकडे अतिक्रमणधारकातील काही दुकानदारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांची भेट घेऊन त्यांना घातले. जी कारवाई नियमांत आहे ती होणारच असे अतिक्रमणधारकांच्या शिष्टमंडळाला सांगितले.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या इमारतीला एकूण तीन गट आहे. पहिल्या दिवशी नंबर गेट पासून तीन नंबर गेटपर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र आज दुसऱ्या दिवशी फक्त एक नंबर ते दोन नंबर गेटपर्यंतचे अतिक्रम हटविण्यात आलेले आहे. ही मोहीम सरकट राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.