केंद्र सरकारच्या विरोधात शहर कॉंग्रेसची आज निदर्शने
पिंपरी – पाच वर्षे होऊन गेली तरी देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यास केंद्रातील भाजपचे सरकार अपयशी ठरले आहे. सरकारचे हे अपयश नागरिकांपुढे मांडण्यासाठी देशभर 5 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत कॉंग्रेस कार्यकर्ते निदर्शने करणार आहेत. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुरुवारी (दि. 7 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात केंद्र सरकार विरोधात निदर्शने करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर कविचंद भाट यांच्यासह संग्राम तावडे, गौतम आरकडे, राजेंद्रसिंह वालिया, मयूर जयस्वाल, शहाबुद्दीन शेख, मकरध्वज यादव, विशाल कसबे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महाजन म्हणाले, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत “बस हो गई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार’ अशा घोषणा देणारे भाजपवाले मागील पाच वर्षांत वाढलेल्या महागाई विषयी गप्प का? मागील पाच वर्षांत एकाही वस्तुचा दर कमी न होता महागाई वाढतच आहे. कमी झालेला जीडीपी दर खोटी आकडेवारी सांगून वाढवून सांगितला जात आहे. जीडीपीचे निकष केंद्र सरकारने बदलून टाकले आहेत. चुकीची व खोटी आकडेवारी दाखवून तीन टक्के असणारा जीडीपी पाच टक्के सांगितला जात आहे. कॉंग्रेसनेच राबविलेल्या अनेक योजना नाव बदलून सादर केल्या जात आहेत. त्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे.
“प्रधानमंत्री फसल बीमा योजनामध्ये’ राफेलपेक्षाही जास्त भ्रष्टाचार झाला आहे. या योजनेतून बीड मधील आठ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी अवघी तीस ते चाळीस टक्के रक्कम नुकसान भरपाईपोटी मिळाली आहे. महाराष्ट्रातील नागरिक पूर आणि महागाईशी लढत असताना राज्य सरकारच्या मंत्र्यांना पाहणी करायला आठ दहा दिवसांनी वेळ मिळाला. मंत्री सदाभाऊ खोत यांनी तर फोटो व्हिडीओसाठी पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला व पर्यटनाचा आनंद लुटला, अशी टिकाही महाजन यांनी यावेळी केली.