अयोध्या प्रकरणावर कोणीही वादग्रस्त वक्तव्य करू नका
नवी दिल्ली : गेल्या अनेक दशकांपासून देशात वादातीत असणाऱ्या अयोध्या राममंदीर प्रकरणावर या महिन्यात कोणत्याही दिवशी निकाल येवू शकतो. दरम्यान, या पार्श्वभूमिवर देशात सर्वत्र अलर्ट राहण्याचे आदेश सरकारकडून देण्यात येत आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना तंबी देण्यात आली आहे. अयोध्या प्रकरणावर कोणत्याही मंत्र्याने अनावश्यक किंवा वादग्रस्त वक्तव्य करणे टाळावे असे आदेश पंतप्रधानांकडून देण्यात आले आहेत.
अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देणार आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच कॅबिनेट मंत्र्यांची बैठक पार पडली. याच बेठकीत पंतप्रधानांनी आपल्या सर्व मंत्र्यांना अनावश्यक वक्तव्य करण्यापासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच देशात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपली ही जबाबदारी असून प्रत्येकाने याविषयाकडे गंभीरपणे पाहणे गरजेचे अहे तसेच अनावश्यक किंवा वाद निर्माण होतील असे वक्तव्य करणे टाळावे असे यावेळी पंतप्रधानांनी म्हटले. तसेच या निर्णयाकडे कोणीही हा निर्णय पराभव आणि विजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नये असा सल्लाही यावेळी पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना दिला.
अयोध्या प्रकरणावरील भडकाऊ आणि भावनिक वक्तव्यांपासून दूर रहावे, अशी मागणी सत्ताधारी भाजपच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व प्रवक्त्यांनी केली आहे. पक्षाने आपल्या खासदारांना शांतता राखण्यासाठी संसदीय मतदारसंघांना भेट देण्यास सांगितले. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबरला आपल्या पदावरून निवृत्त होणार असल्याने अयोध्या प्रकरणातील निकाल पुढील आठवड्यातच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अलीकडील ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांनी अयोध्या प्रकरणावरील अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010 च्या निकालानंतर अराजक व हिंसाचार रोखण्यासाठी सरकार, राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी घेतलेल्या पावले व प्रयत्नांची आठवण केली. देशाच्या सामर्थ्यासाठी ते एकजुटीच्या आवाजाचे उदाहरण म्हणून त्यांनी ते म्हटले.