लखनौ – वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत न्यायालयाच्या आदेशानंतर सलग दुसऱ्या दिवशी सर्वेक्षण करण्यात आले. दुसऱ्या दिवशी मशिदीच्या घुमट आणि भिंतींचे सर्वेक्षण करण्यात आले. दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व्हेक्षण संपणार होते मात्र दुसऱ्या दिवसाचे सर्वेक्षण नियोजित वेळेपेक्षा जास्त चालले. रविवारी दीड वाजण्याच्या सुमारास पाहणी पथक मशिदीतून बाहेर आले. न्यायालयाच्या आदेशानुसार 12 वाजता सर्वेक्षण संपले असून उर्वरित वेळ कामाचे संकलन आणि कागदपत्रे तयार करण्यात खर्ची पडल्याचे पथकातील सदस्यांनी सांगितले. ज्ञानवापी मशिदीचेही सर्वेक्षण उद्या देखील 2 तास केले जाणार आहे. 17 मेला संपूर्ण अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे.
ज्ञानवापी सर्वेक्षण प्रकरणात हिंदू पक्षाचे वकील सुधीर त्रिपाठी यांनी सांगितले की, जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याचवेळी न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार उद्याही सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणादरम्यान दुसऱ्या दिवशीही मशिदीच्या बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. उद्या सर्वेक्षण पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याआधी शनिवारी पहिल्या दिवशी मशीद परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. अधिवक्ता आयुक्त अजय मिश्रा आणि वादी-प्रतिवादी पक्षाचे 52 लोक सर्वेक्षणासाठी आवारात दाखल झाले होते. वाराणसी न्यायालयाने 17 मे पर्यंत ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण पूर्ण करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाबाबत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पहिल्या दिवसाच्या पाहणीनंतर एक मशीद हिसकावून घेतली, पण दुसरी मशीद घेऊ देणार नाही, असे म्हणत सरकारवर निशाणा साधला होता.
त्याचवेळी दुसऱ्या दिवसाच्या सर्वेक्षणानंतरही ओवेसींनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे आणि न्यायालयाचा हा निर्णय 1991 च्या संसदेच्या कायद्याच्या विरोधात असल्याने मी त्याला चुकीचे म्हणेन, असे ओवेसी म्हणाले. ते म्हणाले, ‘मी वारंवार सांगतो की मशीद कमिटी आणि पर्सनल लॉ बोर्डाने या सर्वेक्षण आणि व्हिडिओग्राफीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जावे. मला पंतप्रधान मोदींना विचारायचे आहे की ते संसदेच्या 1991 चा कायदा स्वीकारतील की नाही?, असा सवालही ओवेसींनी केला आहे.