mosque near ayodhya : 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीबाबत निर्णय दिला होता. या निर्णयात मशिदीच्या बांधकामासाठी जमीन दिली जाईल, असेही म्हटले होते. यानंतर अयोध्या शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या धन्नीपूर नावाच्या गावात मशिदीसाठी पाच एकर जमीन देण्यात आली. मात्र, मशिदीचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही. त्याचबरोबर मशिदीच्या बांधकामाला होत असलेल्या दिरंगाईबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बाबरी मशिदीचे समर्थक असलेल्या इक्बाल अन्सारी यांनीही वक्फ बोर्डावर नाराजी व्यक्त केली आहे.
मशिदीच्या बांधकामासाठी वक्फ बोर्डाने ‘इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’ नावाचा ट्रस्ट स्थापन केला आहे. रॉयटर्स न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, या ट्रस्टच्या विकास समितीचे प्रमुख हाजी अरफत शेख यांनी सांगितले की, मे महिन्यात मशिदीचे बांधकाम सुरू होईल. रमजाननंतर हे काम सुरू होणार असून मशीद बांधण्यासाठी सुमारे तीन ते चार वर्षे लागतील.
6 डिसेंबर 1922 रोजी बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली होती. यानंतर देशभरात दंगली उसळल्या. या दंगलींमध्ये सुमारे 2 हजार लोक मारले गेल्याचे सांगण्यात येते. 2019 च्या निर्णयात सुप्रीम कोर्टाने मशीद अशा प्रकारे पाडणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 2.77 एकर वादग्रस्त जमिनीबाबत राम लल्ला विराजमान यांच्या बाजूने निकाल दिला होता.
निधीबाबत समस्या –
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, मुस्लिम समुदाय मशीद बांधण्यासाठी निधीअभावी संघर्ष करत आहे. आयआयसीएफचे अध्यक्ष जुफर अहमद फारुकी म्हणाले की, मशिदीसाठी कोणत्याही प्रकारची सार्वजनिक चळवळ नव्हती किंवा आम्ही कोणाशीही संपर्क साधला नाही. ट्रस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मशिदीचा नकाशा बनवल्यानंतर त्यात अनेक पारंपरिक गोष्टींचा समावेश करावा लागेल. अनेक टॉवर्सही बांधायचे आहेत. त्यामुळे कामाला विलंब होत आहे. याशिवाय मशिदीच्या आवारातच 500 खाटांचे रुग्णालय बांधले जाणार आहे.
या नवीन मशिदीचे नावही निश्चित झाले आहे. त्याचे नाव ‘मस्जिद मुहम्मद बिन अब्दुल्ला’ असे असेल. ते पैगंबर मोहम्मद यांच्या नावावर असेल. तर बाबरी मशिदीला मुघल आक्रमक बाबरचे नाव देण्यात आले होते. मशिदीच्या बांधकामाबाबत बाबरी मशिदीचे वादी असलेले इक्बाल अन्सारी म्हणाले की, राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे याचा मला आनंद आहे, मात्र मशिदीचा नकाशा दाखवून चालणार नाही. ते म्हणाले की, बाबरी प्रकरण संपले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मशीदही बांधली जावी.