हा मार्ग जैं देखिजे । तैं तहान भूक विसरिजे । रात्रिदिवस नेणिजे । वाटे इये ।। चालतां पाऊल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे । आव्हांटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ।।
श्री ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायातील ओवी क्र. 157 ते 160 यामध्ये तन-मन-धन पणाला लावून साधना करीत असताना काय होते याबद्दल माऊली म्हणत आहेत,
एकदा या (योग) मार्गाची गोडी लागली की तहान आणि भूक, रात्र आणि दिवस यांचा जणू विसर पडतो (व्यावहारिक जीवनाबद्दल निरिच्छता प्राप्त होते).
अशावेळी जिकडे आपण जाऊ तिकडे बोधरुपी ज्ञानाची खाण दिसू लागते आणि चुकून (मूळ ध्येय विसरून) एखाद्या आडमार्गाला जरी लागलो तरी स्वर्गसुख दिसते.
पूर्वेकडे निघून पश्चिमेच्या घराकडे यावे (म्हणजे सबंध पृथ्वीला प्रदक्षिणा घालावी) इतक्या दृढपणे या मार्गावरील चालणे असते. या मार्गाने जिथे जायचे असते ते ठिकाणच आपण स्वतः व्हायचे असते. पण हे तू सहजरीत्या जाणत असल्याने वेगळे सांगायची गरज नाही.