वाल्हे – गुंजवणी धरणाच्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने पुरंदरमधील बावीस गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनींवर पुनर्वसनासाठीचे शिक्के मारले होते. गुंजवणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाल्याने पुरंदरमधील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील पुनर्वसनासाठी राखीवचे शिक्के त्वरीत काढावेत, अशी मागणी काही दिवसांपूर्वी भाजप तालुकाध्यक्ष सचिन लंबाते यांनी राज्य शासनाकडे लावून धरली होती. याबाबत पुणे येथे झालेल्या बैठकीत मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पुनर्वसन अधिकारी वाघमारे यांना येत्या महिनाभरात राहिलेले पुनर्वसनाचे काम पूर्ण करुन पुरंदरमधील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्याचे आदेश राज्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती पुरंदर भाजप तालुकाध्यक्ष सचिन लंबाते यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुरंदरमधील 22 गावांच्या शेतजमिनीवरील पुनर्वसनासाठी आरक्षित असा शिक्का काढण्याचा प्रश्न मदत व पुर्नवसन राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पुनर्वसन अधिकारी वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत मार्गी लागला. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, गिरीष जगताप, संजय निगडे, बाळासाहेब भोसले, साकेत जगताप, ऍड. दशरथ घोरपडे, कैलास जगताप, विलास घाटे, सूर्यकांत रणनवरे आदि उपस्थित होते.
वाल्हे परिसरातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील गुंजवणी प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनासाठीचे शिक्के काढण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही कार्यवाही होत नव्हती. अखेर राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक झाली. त्यावेळी जिल्हा पुर्नवसन अधिकारी वाघमारे यांनी आणखी पन्नास शेतकऱ्यांचे पुनर्वसन बाकी असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर मंत्री संजय भेगडे यांनी येत्या महिनाभरात उर्वरीत 50 शेतकऱ्यांचे तातडीने पुनर्वसन करुन पुरंदरमधील सर्व शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील पुनर्वसनासाठीचे शिक्के काढून टाकण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पुर्नवसन अधिकारी वाघमारे यांना दिले.
-सचिन लंबाते, तालुकाध्यक्ष पुरंदर भाजप