पावसाळ्यात सेवा रस्त्यामुळे प्रवासी वैतागले : प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
– कल्पेश भोई
चाकण – नेहमीची येतो पावसाळा, याप्रमाणे चाकण-तळेगाव चौकातील सेवा रस्त्याची अवस्था झाली आहे. सेवा रस्त्यांचा नेमका उपयोग काय हा प्रश्न आता आ वासून उभा आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी सेवा रस्त्याच्याकडेला असणारी गटारे साफ करून प्रवाहित करणे गरजेचे असताना संबंधित विभागाकडून काहीच काम होत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी टोलनाका पासून पुढे चिंबळी, कुरुळी, चाकण ते राजगुरुनगरपर्यंत सेवा (सर्व्हिस) रस्ते करणे आवश्यक असताना फक्त चाकणचा काही भाग वगळता सेवा रस्ते केले नसल्याने किरकोळ, गंभीर अपघात, वाहतूककोंडी याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत विविध संघटनाकडून वेळोवेळी आंदोलनेही झाली मात्र, प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी त्याकडे अजूनही गांभीर्याने पहिले नाही व दखलही घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच चाकण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव चौक व आंबेठाण चौका पुढील उड्डाण पूल हे योग्य त्या ठिकाणी उभारले गेले नसल्याचा हा मुद्दा चर्चिला जात असून पुणे-नशिक महामार्गावर असणाऱ्या दोन्ही उड्डाणपूलामुळे चाकणकरांसह प्रवाशांना वाहतूककोंडीचा मनस्ताप नित्याचाच झाला आहे.
औद्योगीकारणाने या भागात वाढलेली रहदारी तळेगाव-महाळूंगे-खराबवाडीमार्गे चाकण भागातून वळविण्यात येणारी अवजड वाहतूकमुळे चाकणमध्ये वाहतुकीने हैराण व्हावे लागत असल्याने अतिरिक्त रहदारी वाढल्यास वाहतुकीचा कसा फज्जा उडतो याचा प्रत्यय वाहतूक शाखेच्या पोलिसांपासून सर्वांनाच येत आहे. वाहतूक नियमन करण्यासाठी चाकण पोलिसांकडून चाकणरस्ता, चाकणजवळील आळंदी फाटा, आंबेठाण अशा ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. त्यामुळे बहुतांश अवजड वाहतूक लगतच्या भागातून वळवण्यात आलेली असल्याने पुणे-नाशिक महामार्ग, तळेगाव-चाकण शिक्रापूर राज्यमार्ग हे रस्त्यावरील वाहतूक धिम्यागतीने झाल्यासारखी स्थिती आहे. अवजड कंटेनर-ट्रेलर, वाहने बेशिस्तपणे चालविण्यात येत असून अपघात होत आहे. पुणे ते चाकण हा चौपदरी महामार्ग झाला मात्र, या दोन शहरांदरम्यान असणाऱ्या इतर शहरालगत नाशिक फाटा, भोसरी, मोशी, कुरुळी, चिंबळी गावालगतच्या “सेवा रस्त्याची’ची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे.
वाहतूक कोंडीचे प्रमुख कारणे
नाशिक फाटा ते खेड रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मंजूर झाले. तसेच शिक्रापूर, चाकण, तळेगाव रस्त्याचे रुंदीकरणासाठी निधी उपलब्ध झाला; परंतु त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात कधी होणार आहे, याबाबत आता सोशल मीडियावर ही चर्चेची गुऱ्हाळ सुरू झाली आहे. पुणे-नाशिक रस्त्या प्रमाणे या रस्त्यावर औद्योगिक वसाहतीत खराबवाडी, महाळूंगे या ठिकाणी अनेक छोटे-मोठे कारखाने, प्रकल्प असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असून दिवसभरात दोन ते तीनवेळा वाहतूक कोंडीही ठरलेली आहे. अरुंद रस्ते, रस्त्याच्याकडेने वाढणारी अतिक्रमणे, बेशिस्त वाहतूक हे या वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण आहे.