नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे गुजरात राज्याचे प्रमुख गोपाल इटालिया यांना राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स बजावून हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार ते हजर झाल्यावर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तीन तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकारानंतर त्यांनी महिला आयोगाच्या प्रमुखांवर आरोप केले आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
इटालिया म्हणाले महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणतात की त्यांच्या जिवाला धोका आहे. त्या पहिल्या मजल्यावर बसतात. लोक खाली उभे होते. त्यांच्या कार्यालयात सीसीटीव्ही आहेत ते त्यांनी जाहीर करावे. आपल्या राजकीय बॉसप्रमाणे रेखा शर्माही खोटे बोलत असून मी जसे त्यांच्या कार्यालयात गेलो त्यांनी माझी लायकी काढली आणि शिवीगाळ सुरू केली. त्यांनी मोबाइलवर व्हिडिओही बनवला व त्याची एक कॉपी मला देईल असे सांगितले.
मोदी सरकार पटेल समाजाला जेलशिवाय काहीच देऊ शकत नाही. ते पटेल समुदायाचा तिरस्कार करतात. मी सरदार पटेलांचा वंशज असून त्यांच्या जेलला घाबरत नाही. त्यांनी मला जेलमध्ये टाकावे असे आव्हान इटालिया यांनी दिले. तर मोदी सरकार इटालिया यांना एवढी का घाबरते आहे असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे. ज्यांना शाळा चालवता येत नाही ते लोक इटालिया यांना अटक करत असल्याची टीका सिसोदिया यांनी केली आहे.