‘हातावरचं पोट’ वगैरे म्हणणार्यांना काही वर्षांपूर्वी सहानुभूतीची तरी भीक घातली जात असे. पण स्मार्ट वर्क वगैरे करून स्थिरावलेल्यांच्या दृष्टीनं आता कष्टकरी माणसं म्हणजे दृष्टीआडची सृष्टी आहे. ‘शेतकरी शेतात काबाडकष्ट करतो,’ हे वाक्यही या मंडळींना बुळबुळीत वाटू लागलंय. दुसरीकडे, कष्टकर्यांच्या हातातली बहुतांश कामं अवजड यंत्रसामग्रीनं हिसकावून घेतल्यामुळे कष्टांची किंमत शून्याच्याही खाली गेलीये.
हाताला काम नसणं, ही यातून उद्भवलेली एक मोठी समस्या आहे. ‘कष्टाची भली भाजी-भाकरी, तूपसाखरेची चोरी नको,’ असा स्वाभिमानी बाणा दाखवला, तर संबंधिताचा अवतार संपलाच म्हणून समजा! खुश्मस्करे मनाविरुद्ध तडजोडी करून पात्र व्यक्तींच्या तिप्पट वेगानं प्रगती करतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. ज्यांना अंगमेहनत करण्यावाचून गत्यंतर नाही, त्यांचा गैरफायदा घ्यायला वळणावळणावर माणसं टपलेलीच असतात.
मामुली मजुरीची पानं तोंडाला पुसून ही माणसं मोबदल्याच्या तिप्पट-चौपट कामं करून घेतात. मजबुरीचा गैरफायदा घेणार्या या मंडळींना गुलामगिरीचा, वेठबिगारीचा जमाना पुन्हा आणायचाय का, असा प्रश्न पडतो. गुजरातमधल्या अंगावर शहारे आणणार्या एका प्रसंगानं अशाच श्रमचोरीचा भीषण मामला देशासमोर आणलाय. या दुर्दैवी घटनेमुळे बारा संसार होरपळलेत.
अंजार शहरातल्या एका झोपडपट्टीनं रविवारी रात्री अचानक पेट घेतला. झोपडपट्टीतली मजूर कुटुंबं लवकर सावध होऊन घराबाहेर पडली नसती, तर जळून खाक झाली असती. ही आग ‘लागलेली’ नसून ‘लावलेली’ होती, असं तपासात समोर आलं. फिर्यादीतील उल्लेखानुसार, या झोपडपट्टीतल्या फाटक्या लोकांना मजुरीवर कामासाठी नेणारा एक परजीवी इसम त्यांना कामाचा मोबदलाही देत नसे. त्यांच्याकडून फुकटात काम करून घेत असे. अनुभवी मजुरांनी कामावर यायला नकार दिल्यामुळे हा परजीवी इसम इतका संतापला, की त्याने मजुरांच्या झोपड्या पेटवून दिल्या.
मजुरांना जाळून मारण्याचाच त्याचा हेतू होता, असं सकृतदर्शनी समोर आल्यामुळे जाळपोळीबरोबरच खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही संबंधिताविरुद्ध दाखल झालाय. संशयिताने झोपड्या जाळून जिवंत मारण्याची धमकी दिली होती, असंही फिर्यादीत म्हटलंय. फुकट राबण्यास नकार दिल्यामुळे याच व्यक्तीने झोपड्या पेटवून आपल्याला रस्त्यावर आणलं, असं मजुरांचं म्हणणं आहे. संबंधिताला अटक झालीये आणि चौकशीही सुरू आहे; पण अग्निशमन दलाचे बंब येण्यापूर्वीच बारा कुटुंबांचं सर्वस्व जळून गेलं, त्याचं काय? एवढा संताप कशाचा? फुकट राबायला नकार दिल्याचा? सरंजामशाहीत जगतोय का आपण?
डोळसपणे बघितलं, तर श्रमचोरी करणारे असंख्य लोक आपल्याला अवतीभवती दिसतील. काही धडधडीत दिसतील, तर काही परोपकाराच्या मुखवट्याआड लपून जातील. उपाशी राहण्यापेक्षा पोराबाळांच्या पोटात दोन घास ढकलता यावेत, असा विचार करून गरीब मजूर कमी मोबदल्यात कामं करायला तयार होतात आणि ही मंडळी पाचजणांच्या मजुरीत दहाजणांचं काम करून घेतात. वर पुन्हा ‘गरिबांना पोटाला लावलं,’ अशी शेखीही मिरवतात. एकतर आपल्याकडे हाताला काम नसण्याची समस्या वाढतेय. पण त्याचा गैरफायदा घेण्याची वृत्ती मूळ समस्येहूनही घातक!