पुणे – राज्य सरकारच्या हक्काचा 14 हजार कोटींचा जीएसटी परतावा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. यावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला. केंद्र सरकारकडून येणारे जीएसटीचे पैसे हे महाराष्ट्राच्या हक्काचेच आहेत. ते केंद्र सरकारने याआधीच देण्याची गरज होती, असे अजित पवार म्हणाले.
तसेच विरोधकांच्या विचाराचेच सरकार केंद्रात आहे. त्यामुळे जीएसटीचे उर्वरीत पंधरा हजार कोटी रुपये मिळण्यासाठी त्यांनीही आमच्यासोबत प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तसेच, जीएसटीचे पैसे हे इंधन दरवाढ कमी करण्यासाठी नसल्याचे सांगत राज्य सरकारने याआधीच इंधन व गॅसबाबत दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून गॅस वरील टॅक्स कमी केले असल्याची आठवण यावेळी अजित पवार यांनी करून दिली.