भोपाळ – लग्नानंतर नवरीसाठी गाडी सजवायला जात असताना नवरदेवाचा कार अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात घडली. लग्नामुळे घरात आनंदाचे वातावरण असतानाच या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, भिंड येथील कृष्णा काॅलनीमध्ये राहणाऱ्या सोनू वाल्मिकी यांचे लग्न मुरेना जिल्ह्यातील पोसराच्या कन्नोठ गावात ठरले होते. सर्व रितीरिवाजानुसार लग्न पार पडले होते. नवरीला घेऊन जाण्यासाठीची गाडी सजवायला नवरदेव सोनू त्याच्या मित्रांसोबत जात होता. हे लोक गावातून बाहेर पडून हायवेवर आले. त्यानंतर किन्नोठा गावाजवळ आले असता एका कारला ओव्हरटेक करताना कारवरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित कार विजेच्या खांबाला जाऊन धडकली.
ही धडक इतकी जोरदार होती की यातील सर्वजण गंभीर जखमी झाले. त्यानंतर रस्तावरून जाणाऱ्यांनी अपघाताची माहिती 100 नंबर डायल करून पोलिसांना दिली. त्यानंतर सर्वांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच नवरदेव सोनू यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.