नवी दिल्ली, दि. 29- भारतात गेल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 3 लाख 79 हजार 257 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी ठरत आहे. मागील 24 तासांत 3 हजार 645 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.
या 24 तासांत 2 लाख 69 हजार 507 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होत असले तरी पण वाढता मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा आहे.
आता दक्षिण भारतात करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. केरळ आणि कर्नाटक राज्यात जलदगतीने संख्या वाढत आहे. काल मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 30 लाख 77 हजार 121 इतकी झाली आहे. बरे होण्याचा दर खाली येत असून आता 82.23 टक्के झाला आहे, तर मृत्यूदर 1.12 टक्के झाला आहे.