लखनौ-मी खूप प्रयत्न केले, माझ्याएवढे कोणीही झुकणार नाही. दोन वर्षे मी सतत प्रयत्न केले. तरीही मी त्यांचा कोणीच लागत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तुम्ही कितीही प्रयत्न कराल पण तुमचे वडील म्हणत असतील की हा माझा मुलगा नाही तर मग तुम्ही काय करणार? मी स्वाभिमान आणि सन्मानाच्या विरोधात कोणतेही काम करत नाही. असे भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.
तुम्ही दलितांसाठी जर लढत असल्याचे म्हणत असाल तर माजी मुख्यमंत्री मायावती यांच्यासोबत का जात नाही असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. चंद्रशेखर गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. ते स्वत:ला मागासलेले, दलित, गरीब आणि वंचितांचे नेते म्हणवतात.
चंद्रशेखर यांनी निवडणूक जवळ आली असताना आधी बसपा आणि नंतर सपासोबत युती करण्याचा प्रयत्न केला, पण युती होऊ शकली नाही. शेवटी चंद्रशेखर यांनी एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि स्वतः गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास उतरले. चंद्रशेखर म्हणाले की, अखिलेश यादव यांच्याशीही दोन तास बोललो, मात्र ते यालाही खोटे म्हणू शकतात.चंद्रशेखर आझाद यांनी युतीबाबत निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव यांची भेट घेतली होती, पण जागावाटपाचा निर्णय झाला नाही आणि युती होऊ शकली नाही. यानंतर चंद्रशेखर भावूक झाले आणि म्हणाले की, त्यांनी (अखिलेश यादव) त्यांना लहान भाऊ मानून पाठिंबा मागितला असता तर मी त्यांना पाठिंबा दिला असता, पण स्वाभिमान आणि सन्मानाच्या विरोधात जाऊन मी राजकारण करू शकत नाही.