नगर -जिल्ह्यात गेल्या पंधरात ते वीस दिवसांपासून रासायिक खतांचे प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. दर्जेदार खते बाजारात मिळत नाहीत. तर, विक्रेते अन्य कंपन्याच्या खताची विक्री करण्यासाठी धडपडत करीत आहेत. उत्तरेतील पाच राज्यात निवडणुका असल्याने सर्व खतपुरवठा त्या राज्यात वळविल्याने महाराष्ट्रात खताचा तुटवडा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात यंदा पाऊसमान चांगले आहे. ऑक्टोबर, डिसेंबर महिन्यातही टप्प्या टप्याने पाऊस पडत गेल्याने गव्हू, कांदा, ऊस आदी पिकांचे क्षेत्र वाढले आहे. विजेचा लपंडाव सुरू असताना आता खताचा तुटवडा झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट येऊन ठेपले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा परिणाम रासायनिक खतांच्या पुरवठ्यावरही झाला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांना खतवाटपात झुकते माप दिले जात असून, परिणामी राज्यातील शेतकऱ्यांना खतटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
ऐन रब्बी हंगामात खते उपलब्ध होत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. याचबरोबर कच्च्या मालाच्याही किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत. केंद्राकडून खतवाटपाचे नियोजन केले जाते. सध्या उत्तर प्रदेश व पंजाबसह पाच राज्यांत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उत्तर प्रदेश व पंजाबला खतवाटपात झुकते माप दिले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खतविक्रेत्यांकडे सुपर फॉस्फेट वगळता इतर कोणतीही खते उपलब्ध नाहीत. खत कंपन्यांकडे खतांची मागणी करण्यात आली असून, पुरवठा केवळ चार ते पाच टन इतकाच झाला आहे, अशी चर्चा सुरू आहे.
या खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा
<जिल्ह्यात 10-26-26, 15-15-15, 16-16-16, 12-32-16, 24-24-0, 14-35-14, अमोनिअम सल्फेट, युरिया आदी खतांचा तुटवडा भासत आहे. याचबरोबर सरकारने डीएपीचे दर 1200 रुपयांवर निश्चित केले आहेत. हे दर कंपन्यांना परवडत नसल्याने जवळपास सर्वच कंपन्यांनी डीएपीचे उत्पादन बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना डीएपी खतही मिळणे अवघड झाले आहे.