मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ८ आमदारांसह बंड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच शरद पवारांनी ४० वर्षापूर्वी केलेल्या बंडाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
सदाभाऊ खोत यांनी काळ झालेल्या राजकीय घडामोडीवर एक फोटो ट्वीट केला आहे. त्यात माजी मुख्ममंत्री वसंतदादा पाटील, शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. आणि “दादा तुम्ही आज पाहिजेत होता”,असे म्हटले गेले आहे.
४० वर्षापूर्वीच्या बंडाची आठवण करून देत सदाभाऊ खोत यांनी, “स्व. लोकनेते वसंतदादा पाटील, तुम्ही आज असायला पाहिजे होता. देवेंद्रजींनी तुमच्या अपमानाची व्याजासह परतफेड केली आहे.” असे खोचक ट्विट करत शरद पवारांना टोला लगावला आहे.
दादा तुम्ही आज पाहिजेत होता … pic.twitter.com/khfrq3VIy2
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 3, 2023
दरम्यान, आजपासून ४० वर्षापूर्वी म्हणजेच आणीबाणीनंतर महाराष्ट्रात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९७८ साली सरकार स्थापन करण्यात आले होते. रेड्डी काँग्रेसकडून वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. तर, इंदिरा काँग्रेसकडून नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले होते. सरकार स्थापनेनंतर या दोन्ही काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु झाली.
अशातच १९७८ साली ऐन पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षात असलेले शरद पवार ४० आमदारांसह विरोधी बाकांवर जाऊन बसले. त्यामुळे वसंतदादा पाटील यांचे सरकार कोसळले. त्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला. आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.
दरम्यान, अलीकडेच देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून पुलोद सरकार स्थापन केल्याची आठवण सांगितली होती. “शरद पवारांची ती मुत्सद्देगिरी असेल, तर एकनाथ शिंदे यांच्या बंडाला गद्दारी कसे काय म्हणता येईल,” असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला होता.