उस्मानाबाद – राज्यपाल यांनी काही भाषण केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही वक्तव्य केले. त्यांच्याबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नाही. मुळात पद आणि अधिकार याचे तारतम्य राहत नसल्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य केली, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खोचक टोला लगाविला.
उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी गावातील विविध विकास कामाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर जाहीर सभेत त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा खरपूस समाचार घेतला.
शरद पवार म्हणाले, भगतसिंह कोश्यारी हे राज्याचे राज्यपाल आहे. पण त्यांनी दोन कार्यक्रमात वक्तव्य केले. मुळात पद आणि अधिकार याचे तारतम्य नसल्याने त्यांच्याकडून अशी विधान होतात.
राज्यपालांनी अशी वक्तव्यं केल्यानंतर कोण तुम्हाला विचारणार आहे, लोक म्हणतात यांच्या नादाला न लागणे बरे’ असा टोलाही त्यांनी लगावला.
तसेच काही लोकांना सत्ता गेल्यापासून करमत नाही. निवडणूक निकाल लागण्याआधीच “मी येणार, मी येणार’ असे सांगत होते. पण त्यांना आम्ही काय येऊ देतो, अशी मिस्कील टीका पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.