कोल्हापूर (प्रतिनिधी) – महिला बचत गटांची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठा मिळवून देण्यात शासन पुढाकार घेईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय ताराराणी महोत्सवाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आला. यानिमित्त महिला स्वयंसहायत्ता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे विक्री-प्रदर्शन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळाही त्यांच्या हस्ते संपन्न झाला.
हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात बचत गटाची व्यापक चळवळ निर्माण झाली असून या चळवळीला गती देण्याची शासनाची भुमिका आहे. बचत गटाच्या महिलांना व्यवसाय, उद्योग उभारणीसाठी सर्व ते सहकार्य केले जाईल. बचत गटाच्या महिलांनी उत्पादीत केलेल्या उत्पादनांना सुत्रबध्द आणि नियोजनबध्द बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाईल, असेही ते म्हणाले. यापुढील काळात महिला बचत गटांनी काळाची गरज ओळखून सेंद्रीय उत्पादने, कुक्कुट पालनासारखे उद्योग उभे करुन स्वावलंबी बनावे.
याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनीही मनोगत व्यक्त केले. ताराराणी महोत्सवा निमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.