देऊळगावराजे (वार्ताहर)- देऊळगावराजे मंडल अधिकारी कार्यालय अंतर्गत देऊळगावराजे पेडगाव वडगावदरेकर येथील तलाठी कार्यालयामध्ये कामे रखडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. या गावातील शेतकऱ्यांना तलाठी वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी देऊळगावराजे येथील तलाठी फेऱ्या मारून परत जात आहेत.
सध्या शेतकऱ्यांची वारस नोंद सातबारा पीक पाणी नोंद अशी कामे मोठ्या प्रमाणात असून ती कामे योग्य वेळेत होत नसल्यामुळे शेतकरी देऊळगाव राजे, पेडगाव, वडगावदरेकर या गावांतील तलाठी यांच्या विरोधात उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
तलाठी कार्यालयामध्ये वारस नोंदीची कामे दोन ते तीन महिन्यापासून रखडली आहेत. सध्या पीक पाण्याची नोंद ही ऑनलाइन होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयामध्ये येऊन पीक पाणी नोंद करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी पीक पाण्याची नोंद व सातबारा लागत आहे. पण तलाठी वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे आणि तलाठ्यांकडून कामे वेळेवर होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कार्यालयामध्ये नुसत्या फेऱ्या माराव्या लागत आहे.
दौंडचे प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला यांचे कार्यालय देऊळगावराजे तलाठी कार्यालयापासून फक्त बारा किलोमीटर आहे. या कार्यालयांमध्ये जर तलाठीच उपलब्ध होत नसतील आणि शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नसतील तर प्रांत अधिकारी यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे या गोष्टीकडे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांनी वेळेवर लक्ष देऊन शेतकऱ्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
देऊळगावराजेचे तलाठी यांच्याकडे वारस नोंदीसाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्ण प्रकरण दिले असून अजून पर्यंत कुठल्याही प्रकारची वारस नोंद व त्याचा फेरफार झाला नाही. तलाठी सांगत आहे की, वारस नोंदीसाठी सहा महिने ते बारा महिने लागतात. त्यामुळे हळूहळू तुमची वारस नोंद लागेल. – दिनेश पडवळ, देऊळगावराजे.