राहू, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील बागायती क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या राहू बेट परिसरात यंदा मार्चमध्येच सूर्यदेव आग ओकू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. नदीत पाणी आहे. परंतु पिकाला पाणी देता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
परिसरातील गावात वीज उपलब्ध नाही असे नाही. परंतु अनेक तांत्रिक अडचणीमुळे तसेच ओव्हर लोडमुळे ट्रान्सफॉर्मर जाळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे पिके पाण्यावाचून होरपळून जात आहे. वीज मंडळ देखील आपल्या परीने सहकार्य करीत आहे. अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा कमी पडत असल्याने महावितरण देखील हतबल होताना दिसून येत आहे. राहू बेट परिसरात अनेक ठिकाणी कमी दाबाने वीज उपलब्ध होत असल्याने ट्रान्सफॉर्मर, पंप जळण्याचे प्रमाण वाढत आहे.
महावितरण विभाग मागेल त्याला वीज जोड देण्यास तयार असताना अनेक आकडे बहाद्दर आपले कोणी वाकडे करू शकत नाही, या आविर्भावात वीज चोरून वापरत आहेत. परंतु त्याचा फटका प्रामाणिक ग्राहकांना बसत आहे. ओव्हर लोडींगमुळे एखादा ट्रान्सफॉर्मर जळल्यास त्याच्या शेजारच्या ट्रान्सफॉर्मरवर अनिधिकृतपणे आकडा टाकून वीज घेतली जाते. परंतु थोड्याच कालावधीत तो ट्रान्सफॉर्मर देखील ओव्हर लोडिंगमुळे जळतो. त्याठिकाणी प्रामाणिक ग्राहकाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे.
महावितरणने दक्षता घेण्याची गरज
प्रामाणिक ग्राहकांना आकडे बहाद्दरांमुळे ट्रान्सफॉर्मर वेळेत मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. वीज मंडळाने देखील अशा आकडे बहाद्धरांवर कारवाई करून प्रामाणिक ग्राहकांना न्याय देणे गरजेचे आहे. महावितरण व शेतकऱ्यांनी एक मध्य साधून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास गेल्याशिवाय राहणार नाही.