मुकेश अंबानींची कंपनी भागीदारीसाठी बोली लावणार ?
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (बीपीसीएल) लवकरच खासगीकरण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारकडून याविषयीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्र सरकार बीपीसीएलमधील आपली 53 टक्के भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे. तसेच खासगीकरणाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्याची माहिती आहे. यासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकार निविदा काढून त्यानंतर विक्रीची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बीपीसीएलचे सध्याचे भागभांडवल 1.11 लाख कोटी रुपये आहे. बीपीसीएलमधील आपली सर्व भागीदारी विकून 65 हजार कोटी रुपये उभारण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. केंद्र सरकारच्या गुंतवणूकविषयक सचिवांच्या समितीने बीपीसीएलमधील सर्व हिस्सेदारी विकून टाकावी, अशी शिफारस केंद्र सरकारला केली होती. यानंतर बीपीसीएलमधील 53.29 टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच घेणार असल्याची माहिती आहे.
जपानी स्टॉकब्रोकर नोमुरा रिसर्चच्या अहवालानुसार, मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड भारत पेट्रोलियमची भागीदारी घेण्यासाठी बोली लावण्याची शक्यता आहे. याशिवाय पवन हंस या हॅलिकॉप्टर कंपनीलाही बीपीसीएल विकण्याची योजना सरकार तयार करत असल्याची चर्चा आहे.