पुणे – शस्त्रनिर्मिती कारखान्यांच्या कर्मचारी संघटना आणि संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीची बैठक अपयशी ठरल्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखाना कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी कर्मचारी संघटना दिवाळीनंतर पुन्हा संपावर जाण्याचा विचार करत असून यावेळी एक व्यापक जनआंदोलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शस्त्रनिर्मिती कारखान्याच्या “कॉर्पोरेटायझेशन’ विरोधात कारखाना कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपानंतर संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय केंद्रीय समितीतर्फे कर्मचारी संघटनांची बैठक बोलविण्यात आली होती.
मात्र, ती अपयशी ठरली. संघटनांच्या प्रश्नांबाबत कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने संघटनांचा प्रशासनाला विरोध कायम असल्याचे भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे सचिव मुकेश सिंग यांनी सांगितले होते.