राहुरी– सध्याच्या सरकारकडे जाहिरातबाजी करण्यासाठी पैसा आहे. परंतु गोरगरीब जनतेसाठी पैसा नाही. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. फक्त जाहिरातबाजी करून सरकार गतिमान होत नाही. त्यासाठी प्रत्यक्षात कामे करावी लागतात, असा टोला आ. प्राजक्त तनपुरे यांनी आज (सोमवार) येथील तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतेवेळी लगावला.
संजय गांधी निराधार योजनेची बैठक तहसीलदारांनी चार महिने घेतली नाही. हे गंभीर आहे. त्याचा जाब विचारल्यावर सहा दिवसांपूर्वी बैठक झाल्याची खोटी माहिती देण्यात आली. लोकप्रतिनिधींना चुकीची माहिती देणे आणखी गंभीर बाब आहे. या कारणामुळे आज आ. तनपुरे यांनी तहसीलदारांना जाब विचारून धारेवर धरले.
संजय गांधी निराधार योजनेच्या विधवा, अपंग लाभार्थींनी आ. तनपुरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्या वेळी आ. तनपुरे यांनी शुक्रवारी (दि. 23) लाभार्थींसह तहसील कार्यालय गाठले. त्या वेळी तहसीलदार हजर नव्हते. परंतु प्रांताधिकारी किरण सावंत, नायब तहसीलदार संध्या दळवी, नायब तहसीलदार पूनम दंडिले उपस्थित होते. त्यांच्या समक्ष संजय गांधी योजनेचे वरिष्ठ लिपिकांनी 17 फेब्रुवारीस शेवटची बैठक झाल्याचे सांगितले. चार महिने बैठक झाली नसल्याची कबुली दिली. त्यावर प्रांताधिकारी पाटील यांनी सोमवारी बैठक घेऊनलाभार्थींची प्रकरणे निकाली काढली जातील, अशी ग्वाही दिली होती.
त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावतो, असे सांगितले होते. परंतु बैठक झाल्याची खोटी माहिती दिल्याने आ. तनपुरे यांनी आज पुन्हा शेकडो लाभार्थींसह तहसील कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
तत्काळ पात्र, अपात्र लाभार्थींची माहिती संबंधित नगरपरिषद व ग्रामपंचायत कार्यालयाला द्यावी. लाभार्थींना त्यांची प्रकरणे मंजूर झाल्याचे अथवा नामंजूर झाल्याचे कारण व त्रुटींसह कळवावे लागते. लाभार्थींची यादी जनतेच्या माहितीसाठी तहसील कार्यालयात दर्शनी भागात लावावी. तहसीलच्या आवारात काही अनधिकृत सेतूचालक व एजंट आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवून गोरगरीब जनतेची आर्थिक लूट थांबवा, अशी तंबी या वेळी आ. तनपुरे यांनी दिली.