वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानीला धक्का
मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावरच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी व राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. आंबेडकर यांचे निकटचे सहकारी व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर व शेट्टी यांचे जवळचे सहकारी व प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी गुरूवारी आपल्या पदांचे राजीनामे दिले. हे दोन्ही नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांची साथ सोडत भाजपशी सलगी केल्यानंतर रविकांत तुपकर यांची स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यपदी नेमणूक करण्यात आली होती. आक्रमक तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीत अत्यंत आक्रमकपणे प्रचार करत भाजप सरकारवर हल्लाबोल केला होता. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती. त्यावेळी तुपकर यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, आघाडीच्या जागावाटपांत शेट्टींच्या पक्षाला केवळ एकच जागा मिळाली. त्यामुळे तुपकर यांची इच्छा असतानाही लढता आले नाही.
दरम्यान, त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राजू शेट्टी यांनी तुपकर यांना विधानसभेच्या तिकीटाचे आश्वासन दिले होते. मात्र आताही त्यांच्या तिकीटाबाबत स्वाभिमानीतून कोणतेही चर्चा होत नव्हती. त्यामुळे गेली काही दिवस ते पक्षनेतृत्त्वावर नाराज होते. अखेर तुपकर यांनी स्वाभिमानीला रामराम केला. तूपकर हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
धनगर समाजातील नेते गोपीचंद पडळकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली. पडळकर यांनी गुरुवारी सांगलीत याबाबतची घोषणा केली. दरम्यान, गोपीचंद पडळकर हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पडळकर यांनी सोमवारी भेट घेऊन भाजप प्रवेशाबाबत चर्चा केली होती. येत्या 29 ऑक्टोबर रोजी ते भाजपात प्रवेश करतील अशा आशयाच्या पोस्ट त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडियात व्हायरल केल्या आहेत.