नगर (प्रतिनिधी)– विधानसभा निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघासाठी अर्ज भरण्यास शुक्रवार दि.27 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.मात्र सध्या पितृपंधरवडा सुरु असल्याने शनिवारनंतर उमेदवारी अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे. शनिवारी अमावस्या व पितृपक्ष संपत असला तरी रविवारी सुट्टी असल्याने सोमवारपासूनच अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर असून 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी आहे.
त्यामुळे सोमवार, मंगळवार, गुरुवार व शुक्रवार या चार दिवसातच सर्व जण अर्ज भरतील असा अंदाज आहे. अर्ज भरताना जो मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा उमेदवार असेल त्याला केवळ एक सूचक लागणार आहे. मात्र अपक्ष उमेदवाराला दहा सूचक लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवार हे एकहून अधिक अर्ज भरतील कारण ज्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळणार नाही व त्याचा दहा सूचक असलेला अपक्ष अर्ज नसेल तर तो निवडणूक निर्णय प्रक्रियेतून बाद होवू शकतो. अर्जाांची किंमत खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी दहा हजार तर राखीव प्रवर्गासाठी पाच हजार रूपये असणार आहे.
जिल्ह्यातील बारा मतदारसंघात त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी ही प्रक्रिया नियुक्त निवडणूक निर्णय अधिकार्याच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. अर्ज भरण्याचा व अर्ज विक्रीचा उद्या दि.27 पहिला दिवस आहे. मात्र पितृपंधरवड्यामुळे उद्या केवळ अर्ज विक्रीची शक्यता वर्तविली जात आहे. हे अर्ज उमेदवाराला संबंधीत निवडणूक कार्यालयात भरावा लागणार आहे. तो ऑफलाईन भरावा लागणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यालय तो ऑनलाईन भरून निवडणूक आयोगाला पाठविणार आहे.