मुंबई – महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी असून हवामान खात्याने राज्यात पुढील चार-पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात ओढ दिल्याने शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहात आहेत.
भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाली असल्यामुळे येत्या 48 तासांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. या स्थितीचा राज्याला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात देखील पावसाचे कमबॅक होऊ शकते. मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी हिंगोली,
या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणातील ठाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोकण, गोवा येथे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. तसेच पाच ते सात सप्टेंबरदरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात काही दिवसांमध्ये पावसाने उघडीप दिली आणि अचानकच तापमानात लक्षणीय वाढ दिसून आली. मात्र, काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.