नवी दिल्ली :- इंडिया आघाडीची एकजूट राहिल्यास 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल, असे आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.
येथील इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना भारद्वाज यांनी दावा केला की, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा भाग असलेले अनेक पक्ष आगामी काळात विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत सामील होतील.
भाजपचे नेते जयवीर शेरगिल यांनी मात्र या कार्यक्रमात बोलताना दावा केला की, इंडिया आघाडीत अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. परंतु केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या द्वेषामुळे इंडिया आघाडीचे घटक पक्ष एकत्र आले आहेत. पण त्यांची ही आघाडी टिकणार नाही.
शेरगिल यांना दिलेल्या प्रत्युत्तरात भारद्वाज म्हणाले की, इंडिया गटाच्या सर्व घटक पक्षांना त्याग करावा लागेल. इंडिया आघाडी भक्कम राहिली तर मोदी परत येणार नाहीत. आज भाजपच्या आघाडीत अनेक पक्ष केवळ भयाने सामील झालेले आहेत. यातील अनेक पक्ष इंडिया आघाडीत येतील, असा दावाही भारद्वाज यांनी केला.
राष्ट्रीय जनता दल(आरजेडी)चे नेते मनोज झा म्हणाले की, अनेक मतभेद असले तरीही मूलभूत मुद्द्यांवर विरोधी आघाडीच्या घटकांमध्ये सहमती आहे. मतभेद आहेत म्हणूनच आम्ही वेगवेगळे पक्ष आहोत. अन्यथा, आम्ही एकच पक्ष झालो असतो. पण आम्ही मूलभूत मुद्द्यांवर सहमत आहोत, असे झा म्हणाले.