मुंबई : राज्यात पावसाने दडी दिल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.त्यातच पावसाच्या तुटीमुळे राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान,या सर्वात समाधानकारक गोष्ट सध्या समोर येत आहे ती म्हणजे राज्यात आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना हवामान विभागाच्या अंदाजाने काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे. महिन्याच्या सुरूवातील पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. दरम्यान आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यात काही भागांमध्ये पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. तर विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या विदर्भाच्या काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर नाशिक, चंद्रपुरात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांचा गडगडाटासह मुसळधार पावसाने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. तर पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत आणि या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पुढील पाच ते सात दिवस पुणे परिसरात पाऊस कायम असण्याची शक्यता आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.